प्रतिनिधी/वाकरे
सांगरूळ फाटा, कोपार्डे (ता. करवीर) येथील यशवंत बँकेसमोरील शेतात मनगुळी (ता.बागेवाडी,जि. विजापूर,कर्नाटक) येथील पाईपलाईन खुदाई व अन्य कामे करणारे ८० मजूर कुटुंबीय अडकले असून सध्या त्यांची अन्नधान्यविना उपासमार होत आहे. त्यांना दानशूर संस्था आणि व्यक्तींनी अन्नधान्याची मदत करावी असे आवाहन या टोळीचे मुकादम श्रीकांत उर्फ कांतू राठोड यांनी केले आहे.
विजापूर जिल्ह्यातील मनगुळी येथील अनेक मजूर प्रत्येक वर्षी सांगरुळ फाटा,कोपार्डे या परिसरात दसरा-दिवाळीच्या दरम्यान हंगामी कामासाठी येतात. परिसरातील शेतकऱ्यांची पाईपलाईन खुदाई, खड्डे काढणे, कंपोस्ट खत भरणे,जुन्या इमारती पाडणे अशी किरकोळ कामे करून ते उपजीविका करत असतात. प्रत्येक वर्षी या परिसरात मिळेल त्या जागी झोपड्या उभा करून ते राहत असतात. हंगाम संपल्यानंतर मे अखेरीस ते आपल्या गावी परत जातात.
पण यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात गेला एक महिना लॉक डाऊन आहे. त्यामुळे या परिसरात सर्व प्रकारची कामे बंद आहेत.परिणामी मजुरी करणाऱ्या या कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. गेला महिनाभर काम नसल्याने आणि शेतीची कामे ठप्प झाल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी पुढे येऊन या कुटुंबांना धान्याची मदत करणे गरजेचे आहे. राज्यबंदी असल्यामुळे त्यांना आपल्या गावी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना आपापल्या गावी जाण्यासाठी शासन स्तरावर निर्णय व्हावा अशी मागणी होत आहे.