राजस्थानातील अजमेर येथील नागरिक विमल पंजवानी यांच्या यशाची ही कहाणी आहे. 32 वर्षांच्या पंजवानी या इंजिनियर आणि एमबीए आहेत. 2012 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ नोकरी केली. विविध क्षेत्रांमध्ये काम करून पुरेसा अनुभव मिळाल्यानंतर कोरोनाकाळात म्हणजे दीड वर्षापूर्वी त्यांनी एक स्टार्टअप् कंपनी सुरू केली.
सध्या रिन्युएबल एनर्जी उत्पादनांना चांगली मागणी आहे. ही उत्पादने पर्यावरण संवर्धक असल्याने सरकारकडूनही त्यांना सवलती दिल्या जातात. पंजवानी यांनी कृषी क्षेत्राचा विशेष अभ्यास केला असून शेतीसाठी उपयुक्त अशी रिन्युएबल एनर्जी उत्पादने तयार केली आहेत. त्यांची स्टार्टअप् कंपनी संशोधनाच्या पायावर (रिसर्च बेस्ड) उभी आहे. ऍग्रीविजय असे या कंपनीचे नाव आहे. सोलार वॉटरपंप हे त्यांचे विशेष उत्पादन आहे. या पंपाला कोळसा जाळून केलेली वीज लागत नाही. सौरघटांवर हा पंप काम करतो. त्यामुळे प्रदूषण न होता शेतीला पाणी मिळण्याची सोय होते. त्यांच्याकडे अत्यंत मर्यादित पैसे असतानाही त्यांनी आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर या उत्पादनाची निर्मिती केली आहे. राजस्थान आणि पंजाबमधल्या अनेक शेतकऱयांनी हे उत्पादन आपल्या शेतात बसविले असून त्यांचा अनुभव चांगला असल्याचे सांगितले जाते.