आतापर्यंत 3 लाखाहूनअधिककोरोनामुक्त, 16 हजार 475 जणांचामृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात रुग्णसंख्या वाढीचे संख्या सोमवारीही कायम राहिली. 24 तासांमध्ये 19 हजार 459 नवे रुग्ण आढळले. 380 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशभरातील एकूण रुग्णसंख्या ही 5 लाख 48 हजार 318 इतकी झाली आहे. यातील दोन लाख 10 हजार 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 21 हजार 721 जण पूर्ण बरे झाले आहेत. देशातील 58 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या 16 हजार 475 वर पोहोचली आहे, अशी माहिती सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
देशात 100 चाचण्यांमागे 6 रुग्ण
कोरोना चाचणींची संख्या मोठय़ा प्रमाणावर घेण्यात येत आहेत. त्यामुळे दररोज सुमारे 20 हजारांच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. 28 जूनपर्यंत देशात 83 लाख 98 हजार 362 चाचण्या घेण्यात आल्या. देशात सध्या 100 चाचण्यांमागे 6 रुग्ण आढळत आहेत. ब्राझीलमध्ये 100 चाचण्यांमागे 45 रुग्ण सापडत आहेत. यानंतर अमेरिका, रशिया आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो.
दिल्ली होणार देशातील पहिली प्लाझ्मा बँक
कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी दिल्लीत देशातील पहिली ‘प्लाझ्मा’बँक दोन दिवसात सुरू होईल. येथून डॉक्टरांच्या मागणीनुसार रूग्णांना प्लाज्मा पुरवठा केला जाईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिली. दिल्लीमध्ये प्लाझ्मा उपचार पद्धतीला लक्षणीय यश आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांना फ्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना बाधा
तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महम्tद अली यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी रात्री यांना हैदराबादमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अली हे 25 जून रोजी वरिष्ठ अधिकाऱयांसमवेत वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. कोरोनाची लागण होणारे ते तेलंगणाचे पहिले मंत्री आहेत. देशातील सर्वाधिक बाधित राज्यांमध्ये तेलंगणाचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल सरकार करणार ‘संदेश’ मिठाईचे वाटप
प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर कोरोनाचा सहज मुकाबला केला जाऊ शकतो, हे वैद्यकीय संशोधनात सिद्ध झाले आहेत. आता पश्चिम बंगाल सरकार नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पुढील दोन महिन्यांमध्ये संदेश मिठाईची विक्री करणार आहे. या मिठाईमध्ये सुंदरबन येथील प्रसिद्ध मध, गाईचे दूध, तुळशीचा अर्क या पदार्थांचा वापर करून ही मिठाई तयार केली जाईल. या मिठाईमुळे नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यात मदत होईल, असा दावा राज्याचे पशुधन संशोधन विकास विभागाने केला आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये सरकार विक्रीसाठी ही मिठाई बाजारात आणेल, अशी माहिती मंत्री मांतुराम पखीरा यांनी दिली. याची किंमतही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात असेल, असेही ते म्हणाले.
पीपीई कीट निर्यातीस केंद्राची मंजुरी
केंद्र सरकारने व्यक्तिगत संरक्षण साधनाच्या (पीपीई) मर्यादित निर्यातीस मंजुरी दिली आहे. देशांतर्गत मोठया प्रमणावर ‘पीपीई’ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे आता दर महिन्याला 50 लाख ‘पीपीई’कीट निर्यात करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.
बीएसएफचे आणखी 21 जवान पॉझिटिव्ह
सीमा सुरक्षा दलाचे बीएसएफ आणखी 21 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत 995 जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यातील 655 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 305 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.