कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या ऐतिहासिक लॉकडाऊनला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. किंबहुना कोरानाच्या या दुष्टचक्रातून देश व देशातील नागरिक अद्यापही मुक्त होऊ शकलेले नाहीत. उलटपक्षी मागच्या महिन्यापासून महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांना दुसऱया लाटेचा तडाखा बसू लागल्याचे दिसत आहे. हे पाहता कोविडचे आव्हान अद्यापही कायम आहे, हे नक्की. अर्थात हा चक्रव्यूह भेदण्यासाठी सर्व नियमांच्या पालनाबरोबरच लसीकरणाचा कार्यक्रमही आपल्याला यशस्वीरीत्या तडीस न्यावा लागेल. चीनमधील वुहान प्रांतातून चंचूप्रवेश केलेल्या या विषाणूने बघता बघता साऱया जगभर हातपाय पसरले. आत्तापर्यंत या महामारीने जवळपास 27 लाखांहून अधिक जणांना बळी घेतला आहे. आता पुन्हा मृत्यूदर वाढू लागल्याने नागरिकांना भीतीच्या सावटाखालीच वावरावे लागते आहे. 24 मार्चला जाहीर झालेला लॉकडाऊन, त्यानंतर त्याची पुन्हा वाढविण्यात आलेली मुदत, कोरोनाच्या तीव्र लाटेत लाखमोलाच्या माणसांना गमवावा लागलेला जीव हा टप्पा सगळय़ांसाठीच अत्यंत कठीण परीक्षेचा होता. या कालखंडात अनेकांना आपल्या नोकऱया गमवाव्या लागल्या. कित्येकांचे धंदे बसले. अर्थचक्रावरच आघात झाल्याने क्रयशक्तीच घटली. अनलॉक प्रक्रिया व लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर सर्व काही सुरळीत वा यथास्थित होण्याच्या आशा बळावत असतानाच या विषाणूने नवनव्या रूपात डोके वर काढल्याने पुन्हा चिंतेचे गडद ढग दाटलेले दिसतात. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश यासारख्या राज्यात बाधितांचा आकडा रोज वाढतोच आहे. देशात मागच्या दोन दिवसात 90 ते 91 हजारांपर्यंत रुग्णांची नोंद होणे व एका दिवसात 200 हून अधिक जणांचा मृत्यू होणे, यातूनच साथीची तीव्रता वाढल्याचे दिसून येते. पुणे, मुंबई, नागपूर या महानगरातही दररोज अडीच ते तीन हजारांवर रुग्णांची नोंद होत असून, बेडअभावी रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. कोविड महामारीत मागच्या वर्षभरात उपचाराअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सरकारने या आघाडीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट कायम असले, तरी त्याविषयीची भीती बऱयाच अंशी दूर झाल्याने अनेक महाभाग सर्व नियम पायदळी तुडवत विनामास्क बिनधास्तपणे फिरत असतात. ही सारी बेफिकिरीच याच्या मुळाशी आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. नागरिकांना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागेल. अन्यथा, लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही निर्वाणीचा इशारा दिला आहे. खरे तर संपूर्ण लॉकडाऊन आज कुणालाच परवडणारे नाही. पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खाद्यतेलांच्या दरातील भरमसाठ वाढीसह महागाईच्या भडक्याने आजमितीला सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण बनले आहे. त्यात वैद्यकीच खर्चातही मोठी वाढ झाली आहे. रोजच्या खर्चाची तोंडमिळविणी करताना मेटाकुटीला आलेल्या नागरिकांच्या रोजगार वा छोटय़ा मोठय़ा व्यवसायावरच गदा येत असेल, तर त्याने करायचे काय, याचे उत्तर कुणाकडेच नाही. म्हणूनच प्रत्येकाने कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास प्राधान्य द्यावे. महाराष्ट्रात सुशांतसिंह राजपूत प्रकरण शांत झाल्यानंतर आता मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण व परमबीरसिंह यांच्या लेटरबॉम्बचे प्रकरण गाजते आहे. प्रशासनावर पकड नसलेले सरकार नि केवळ वादग्रस्त मुद्दय़ांवर भर देणारे विरोधक अशा या दोघांच्या मारामारीत महामारीचे कुणालाच पडलेले नाही, अशीच आजघडीची स्थिती आहे. या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी व त्यातून सत्य बाहेर यावे, ही प्रत्येकाचीच इच्छा असेल. तथापि, सरकार व विरोधकांनी जनतेच्या जगण्यामरण्याच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीस अग्रक्रम द्यायला हवा. दुसऱया बाजूला कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा घेण्याच्या मुदतीमध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे. ही लस 28 दिवसांऐवजी आता सहा ते आठ आठवडय़ांच्या अंतराने दिली जाणार आहे. दुसरा डोस अधिक अंतराने दिल्यानंतर तो अधिक परिणामकारक ठरत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. कोव्हिशिल्डच्या नवीन अहवालात या लशीची कार्यक्षमता 79 टक्क्यांपर्यंत असून, लस दिलेल्या 100 टक्के लोकांना रुग्णालयात घेऊन जाण्याची गरज पडली नसल्याचे ऑक्सफर्डच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. लसीकरणासंदर्भातील या बाबी सकारात्मकच होत. देशात आत्तापर्यंत पावणे पाच कोटींच्या आसपास लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. लसीकरणाचा पल्ला अजून मोठा आहे. हे पाहता या पातळीवर बरेच काम करावे लागेल. तसेच लोकमनातील संभ्रमही दूर करावे लागतील. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळय़ा होऊन काही जण दगावल्याचे कारण देऊन युरोपातील काही देशांनी लशीचा वापर थांबविला होता. स्वाभाविकच अनेक लोकांच्या मनात त्याबाबत शंकाकुशंका निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर ऍस्ट्रोझेकाची लस प्रभावी व सुरक्षित असल्याचा कंपनीने दिलेला निर्वाळा दिलासादायक. लस घेतल्यानंतरही कोरोना होत असेल, तर ती घ्यायची कशाला, असा प्रश्न करणारीही मंडळी दिसतात. तथापि, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी लशीची गरज पटवून द्यावी. अनेकपदरी मास्कमुळे विषाणूचा प्रसार टळत असल्याचा निष्कर्ष बेंगळूरमधील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसच्या संशोधनातून काढण्यात आला आहे. सँडियागोतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या मदतीने झालेल्या या संशोधनातून बोध घेऊन मास्क हा जीवनशैलीचा भाग झाल्याचे सत्य सर्वांनी स्वीकारावे. कोरोना विरुद्ध माणूस ही लुटूपुटूची लढाई नव्हे. हे दीर्घकालीन महायुद्धच आहे. ते जिंकण्याकरिता महामारीच्या लाटांचा चक्रव्यूह आधी भेदावा लागेल.
Previous Articleशाहूपुरी पाणी योजना लवकर कार्यान्वित करा
Next Article न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.