प्रतिनिधी / सांगली
मंगळवारी जिल्हय़ात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. पलूस तालुक्यातील आंधळी येथील ६७ वर्षाच्या महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा जिल्हय़ातील नववा बळी ठरला आहे. एकूण रूग्णसंख्या २५९ झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या ११५ आहे.
शिराळा तालुक्यात रूग्ण वाढले
जिल्हय़ातील शिराळा तालुक्यातील मणदूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. याठिकाणी आणखीन तीन रूग्ण वाढले आहेत. यामध्ये ५४ वर्षाची व्यक्ती, ५८ वर्षाची महिला आणि ६८ वर्षाची व्यक्ती यांचा समावेश आहे. त्यामुळे एकटय़ा मणदूरमध्ये रूग्णसंख्या आता ५० च्या वर गेली आहे. तर शिराळा शहरात ५२ वर्षाची महिला पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या तालुक्यात एकूण चार रूग्ण वाढले आहेत.
मौजे डिग्रज येथे महिला बाधित
मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे ४२ वर्षाची महिला पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मौजे डिग्रज येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या महिलेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने हा भाग कंटेन्मेट झोन करण्यात आला असून याठिकाणी औषध फवारणी सुरू केली आहे.
आंधळी येथील महिलेचा मृत्यू
पलूस तालुक्यातील आंधळी येथे मुंबईहून १४ जून रोजी ६७ वर्षाची महिला आली होती. या महिलेची प्रकृती अत्यवस्थ होती त्यामुळे तिला १५ जून रोजी तातडीने मिरजेच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. तिचा स्वॅब घेण्यात आला होता. त्या महिलेच्या स्वॅबचा अहवाल येण्यापुर्वीच या महिलेचा १६ जून च्या पहाटे मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिचा मृत्यू हा कोरोनानेच झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील कोरोनाने बळी गेल्याची संख्या आता नऊ झाली आहे. या महिलेच्या संपर्कातील सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
दहा जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात मंगळवारी एकाच दिवशी दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील १९ वर्षीय युवक, करगणी येथील ३८ वर्षीय व्यक्ती, लेंगरेवाडी येथील ४७ वर्षीय व्यक्ती, मिरज तालुक्यातील मालगाव येथील ५० वर्षाची महिला, शिराळा तालुक्यातील रिळे येथील ५३ वर्षाची महिला, सोनवडे येथील २८ वर्षाचा युवक, वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील ५८ वर्षाची व्यक्ती, कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील ५० वर्षाची महिला, पलूस येथील ५५ वर्षाची व्यक्ती, तासगाव तालुक्यातील पेड येथील ३५ वर्षाची व्यक्ती या सर्वांच्यावर दहा दिवसाचे उपचार करण्यात आल्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. हे स्वॅब निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत.
अतिदक्षता विभागात पाच जणांवर उपचार सुरू
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील ६० वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील ५० वर्षीय महिला, विटा-हनुमंतनगर येथील ३४ वर्षीय व्यक्ती आणि कडेगाव तालुक्यातील वांगी येथील ६९ वर्षीय व्यक्ती, जत तालुक्यातील अंकले येथील ६६ वर्षीय व्यक्ती अशा पाच जणांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण २५९
बरे झालेले १३५
उपचारात ११५
मयत ०९