तीन संशयित रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात : विमानतळावर 1,739 जणांची तपासणी
प्रतिनिधी/ मुंबई
सध्या चीनमध्ये हाहाकार माजविणाऱया कोरोना या जीवघेण्या आजाराची लागण झालेले तीन संशयित रुग्ण गेल्या दोन दिवसात मुंबई विमानतळावर आढळून आले आहेत. हे तिन्ही रुग्ण वसई, पालघर येथील रहिवासी असून ते चीन, हाँगकाँग येथे जाऊन आले आहेत. त्यांच्यात कोरोना या रोगाची लक्षणे आढळल्याने त्यांना तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली. या तिन्ही रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. येत्या 24 तासात त्यांचे अहवाल येतील. त्यावरून त्यांना नक्की कोरोना आजार झाला की नाही याचे निदान होणार आहे.
मुंबई महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी विमानतळावर यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. पालिका आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी उगाच घाबरून जाऊ नये. या आजाराची काही लक्षणे आढळून आल्यास त्वरित उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेतर्पे करण्यात आले आहे.
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीअंतर्गत 18 जानेवारीपासून आतापर्यंत 1,739 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे समजते. त्यामध्ये वसई येथील दोघेजण हे चीनला जाऊन आले असून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने तात्काळ गुरुवारीच कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर शुक्रवारी हाँगकाँग येथून आलेल्या पालघर येथील एका नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यालाही तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे काकानी यांनी सांगितले. यातील ज्या दोघांना गुरुवारी कस्तुरबामध्ये दाखल केले ते 16 जानेवारी रोजी चीनला गेले होते. 21-22 जानेवारीला ते मुंबईत परतले. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना संशयित म्हणून तात्काळ उपचारासाठी दाखल केले. तर आणखीन एकजण हाँगकाँगला 1 जानेवारी रोजी गेला होता. तो 9 जानेवारी रोजी मुंबईत परतला. त्याच्यात शुक्रवारी, 24 जानेवारी रोजी कोरोनाची लक्षणे आढळल्याने तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती काकानी यांनी दिली.
कोरोना व्हायरसचा विळखा घट्ट
चीनमधील 13 शहरांमध्ये ‘नाकेबंदी’ : भारतासह थायलंड, जपान, दक्षिण कोरियातही अलर्ट
चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबता थांबेनासा झाला आहे. चीन प्रशासनाने खबरदारी म्हणून विषाणूंचे सर्वात मोठे प्रभाव क्षेत्र असलेल्या वुहान आणि इझोऊ येथील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. या दोन्ही शहरांमध्ये बस, रेल्वे आणि विमानसेवा स्थगित केली आहे. तसेच आता अतिदक्षता म्हणून अन्य 13 शहरांमध्ये विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूने आता भारतात प्रवेश केला असून मुंबईत दोन संशयित रुग्ण आढळल्याने वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत तब्बल 40 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जगभरात या विषाणूची धास्ती आहे. हाच विषाणू मुंबईत दाखल झाल्याने भीती व्यक्त होत आहे. चीनमध्ये या व्हायरसचा विळखा अधिकच घट्ट होऊ लागला असून 830 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. वुहानसह 13 शहरे बंद ठेवण्यात आली आहेत. वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत असल्यामुळे त्यांनाही सतर्कता घ्यावी लागत आहे.
चीनपाठोपाठ भारत, थायलंड, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात मुंबईसह दिल्ली, कोलकाता विमानतळावर चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतात 18 जानेवारीपासून देशभरातील सात विमानतळांवर बाधित भागातून येणाऱया प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबईतही चीनमधून येणाऱया प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 1,739 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. भारतात अद्याप या आजाराचा प्रसार झालेला नाही. केरळमधील एका नर्सला हा आजार झाल्याचे वृत्त पसरले होते. तथापि, राज्य सरकारने ते नाकारले होते.
चीनमध्ये कठोर उपाययोजना
कोरोना या घातक विषाणूचा प्रसार देशभर होऊ नये, यासाठी चीनने अत्यंत कठोर उपाय अंमलात आणले आहेत. त्यानुसार तेरा शहरांची नाकेबंदी करण्यात आली असून या शहरांमधून बाहेर पडण्यास किंवा या शहरांमध्ये जाण्यास नागरिकांना बंदी करण्यात आली आहे. यामुळे चार कोटीहून अधिक नागरिकांची अक्षरशः कोंडी झाली असून त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
गुरुवारपर्यंत ही बंदी केवळ चार शहरांपुरती मर्यादित होती. मात्र या विषाणूचा प्रसार पाहता ती तेरा शहरांपर्यंत नेण्यात आली. येत्या दोन-तीन दिवसात आणखी शहरे या बंदीच्या कार्यकक्षेत आणण्यात येणार आहेत. या विषाणूंचा प्रसार कसा आणि कोणी केला? याची चौकशीही चीन सरकार करीत आहे.
अद्याप प्रभावी औषध नाही
हा आजार नवा असल्याने त्यावर अद्याप प्रभावी औषध नाही. या आजाराची प्राथमिक लक्षणे फ्लू सारखीच आहेत. त्यामुळे कित्येकदा डॉक्टरांचाही गोंधळ होऊन आजार बळावल्यानंतरच त्याचे अस्तित्व लक्षात येते. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो, असा अनुभव आहे. त्यामुळे यापासून बचावाचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे काळजी घेणे.
‘कोरोना’ची लक्षणे…
नाक गळणे, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि ताप येणे.
न्युमोनिया, फुफ्फुसांना सूज, शिंका येणे, दमा आदी त्रास संभवतात.
कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांना कोरोनाची लागण लवकर होते.
वयस्कर आणि लहान मुलांना या विषाणूची लागण सहजगत्या होते.
बचावाचे उपाय…
संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी. हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
खोकताना व शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल धरावा.
सर्दी-ताप-खोकला असलेल्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
मांस, मासे आणि अंडी नीट शिजवून नंतरच सेवन करावीत.
जंगल-शेतात काम करणाऱयांनी जनावरांपासून सुरक्षित राहावे.