पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची सूचना : सरकारी विश्रामधाम येथे बैठक : पावसामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा
प्रतिनिधी /बेळगाव
कोविडची तिसरी लाट ही मुलांवर अधिक परिणामकारक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेण्यासाठी आतापासूनच पालकांनी आणि जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले आहे. सरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी ही सूचना केली आहे.
कोविड तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी ते बेळगावला आले होते. त्यावेळी त्यांनी अधिकाऱयांची बैठक घेऊन वरील सूचना केल्या आहेत. सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र प्रमाण कमी झाले आहे म्हणून कोणीही गाफील राहू नये, असे त्यांनी यावेळी सांगितले. कारण तिसरी लाट ही मुलांना धोकादायक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तथापि मुलांवर उपचार करण्यासाठी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसह सर्व तयारी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुलांवर त्याचा परिणाम होत असेल तर बालरोगतज्ञ उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये तसेच इतर ठिकाणी आताच बालरोगतज्ञांची नियुक्ती करण्यासाठी पाऊल उचलावे, असे त्यांनी सांगितले. आपत्तकालीन काळात खासगी डॉक्टरांनाही सामावून घ्या. त्यामुळे आजाराचा प्रसार होणार नाही. औषधाची कमतरता भासू नये याकरिता आतापासूनच अत्यावश्यक औषधांची यादी तयार करून ती सरकारकडे पाठवून द्यावी, असे त्यांनी सांगितले.
दुसऱया लाटेमध्ये मृतांचा आकडा अधिक आहे. तेंव्हा लसीकरणावर अधिक भर देऊन मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकडे डॉक्टरांनी लक्ष द्यावे, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. जिल्हय़ातील डॉक्टर व अधिकाऱयांनी कोरोनावर नियंत्रण मिळविले, याबद्दल पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी त्यांचे कौतुक केले. विशेष करून बिम्स प्रशासनाची व्यवस्था सुधारण्यासाठी प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी जे काम केले ते वाखणण्याजोगे आहे, त्यामुळे त्यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
यावेळी प्रादेशिक आयुक्त अम्लान बिस्वास यांनी सांगितले की, बिम्स हॉस्पिटलमध्ये योग्यप्रकारे आहार दिला जात नाही. तसेच स्वच्छता नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी तेथील डॉक्टरांनी प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी कर्मचारी आवश्यक असतील तर त्यांची नियुक्ती करावी आणि तेथील सर्व व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. ऑक्सिजनची कमतरता कमी पडू नये यासाठी पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
बळ्ळारी नाल्यासाठी 800 कोटींचा आराखडा
बळ्ळारी नाल्यामुळे दरवषी मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. बळ्ळारी नाल्याच्या सुधारणेसाठी 800 कोटींचा प्रकल्प राबविला जाणार आहे, असे पालकमंत्री कारजोळ यांनी सांगितले. यावेळी खासदार मंगला अंगडी यांनीही कायमस्वरुपी ही समस्या दूर करण्यासाठी 800 कोटींची तातडीने तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत सरकारकडे आराखडा पाठवून दिला आहे. तेंव्हा तातडीने त्याला मंजुरी मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
बियाणे-खताची कमतरता नाहा
सध्या जिल्हय़ामध्ये 42 हजार क्विंटल बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. याचबरोबर बियाणांचा साठाही आहे. तसेच खताचीही कमतरता नाही. मात्र नुकत्याच झालेल्या पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील भात पिकाचे नुकसान झाले आहे. तेंव्हा त्याचा सर्व्हे करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
लस घेण्यासाठी 1 लाख जणांनी केली नोंदणी
लस घेण्यासाठी जनता पुढे येत आहे. दररोज एक लाख जण लस घेण्यासाठी नोंदणी करत आहेत. त्यांना येत्या काही दिवसांत लस दिली जाईल. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. दुसऱया लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागचे कारण हे उपचारासाठी उशिराने दाखल होणे हे आहे. त्यामुळेच ब्लॅक फंगसनेही बऱयाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.