मास्क, सामाजिक अंतरासह मार्गदर्शक तत्वांचे कडक पालन आवश्यक : राज्यात सर्वत्र लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या भयानक वेगाने वाढत असून आतापर्यंतचे एका दिवसाचे विक्रमी रुग्ण काल गुरुवारी सापडले आहेत. त्याचबरोबर रोजच्या मृतांची संख्याही मोठय़ा गतीने वाढत असून गुरुवारी तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. दुसऱया बाजूने हाताबाहेर जाणारा रुग्णवाढीचा हा वेग नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. लसीकरण माहिमेलाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
गुरुवारी 757 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याद्वारे सक्रिय रुग्णसंख्या 5682 वर पोहोचली आहे. 24 तासात पाच जणांचे बळी गेल्यामुळे सुरुवातीपासून आतापर्यतच्या एकूण मृतांचा आकडा 862 वर पोहोचला आहे. गत 8 दिवसातच 22 जण दगावले असून त्यात दि. 14 व 15 या दोन दिवसात मृत पावलेल्या 9 जणांचा समावेश आहे.
गत 24 तासात 182 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 97 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे व 367 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 64572 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 58028 जण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 89.87 टक्क्यांवर पोहोचले आहे.
मडगावात सर्वाधिक 660 रुग्ण
राज्यातील जवळजवळ सर्वच केंद्रे रुग्णांच्या गर्दीने खचाखच भरली आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. मडगाव आरोग्य केंद्रातील रुग्णसंख्या रोजच मोठय़ा गतीने वाढत असून सध्या तेथे सर्वाधिक 660 रुग्ण आहेत. द्वितीय स्थानी पर्वरी केंद्र असून तेथे 558 रुग्ण आहेत. त्याखालोखाल म्हापसा केंद्रात 401, पणजीत 398, फोंडय़ात 380, कांदोळीत 321, कुठ्ठाळीत 284, वास्कोत 271, चिंबल 204, कासावलीत 174, शिवोलीत 164, खोर्लीत 137, पेडणे व डिचोलीत प्रत्येकी 134, सांखळी 124, हळदोणे 116, चिंचिणीत 110, शिरोडा 102, काणकोण 98, कुडचडे 94, कुडतरी, लोटली व नावेलीत प्रत्येकी 89, सांगे 87, कोलवाळ 86, वाळपईत 60 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत. रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे परराज्यांतून आलेले 21 बाधित सापडले आहेत.
दोन लाखांहून अधिकजणांचे झाले लसीकरण
सध्या गोव्यात चालू असलेल्या कोरोना लसीकरणाच्या टीका उत्सवास चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत लस घेणाऱयांची संख्या 2 लाख पार झाली आहे. सुमारे 2 लाख 07 हजार 173 जणांनी कोरोनाची लस घेतली असून त्यापैकी 1 लाख 68 हजार 631 जणांना पहिला डोस प्राप्त झाला आहे तर शिल्लक राहिलेल्यांना दुसरा डोसही मिळाला आहे.
गोव्यात 21 एप्रिलपर्यंत लसीकरण मोहिम अर्थात ‘टीका उत्सव’ चालणार असून 45 वर्षांवरील सर्वांनी डोस घ्यावेत आणि त्यांना डोस मिळावेत म्हणून प्रयत्न जारी आहेत. वरील मुदतीत ते ध्येय पूर्ण करावे असे सरकारने, आरोग्य खात्याने ठरविले असून अनेक पंचायतीतही लसीकरण मोहीम चालू करण्यात आली आहे.