एस. एम. जाधव यांचे प्रतिपादन :
प्रतिनिधी/ बेळगाव
कारोना या महामारीच्या काळात डॉक्टरांनी दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. त्यामुळेच त्यांना कोरोना योद्धय़ांचा दर्जा दिला गेला आहे. यापूर्वीही डॉक्टरांनी आपत्तीवेळी कौतुकास्पद कामगिरी बजाविली आहे. ज्या गावांपर्यंत वाहतुकीच्या सोयी नाहीत अशा गावांमध्ये जाऊन डॉक्टरांनी रुग्णांची सेवा केली आहे. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरुपात का होईना आपण या डॉक्टरांचा गौरव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आदर्श सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव यांनी केले.
जायंट्स मेन तर्फे डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून 5 डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. अनगोळ कॉर्नर येथील आदर्श सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एस. एम. जाधव बोलत होते. व्यासपीठावर जायंट्स मेनचे अध्यक्ष संजय पाटील, अनंत जांगळे, विजय बन्सी, मोहन कारेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. सी. जी. पाटील, डॉ. रोहण भिसे, डॉ. मनोज पाटील, शैलेश उद्पुडी, डॉ. संपत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. शैलेश उद्पुडी म्हणाले, जायंट्सचा सत्कार स्वीकारून सामाजिक जबाबदारी वाढली आहे. सध्या कोरोनाचा काळ असून, प्रत्येकानेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
जायंट्सच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मदन बामणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पुंडलिक पावशे यांनी केले. शिवराज पाटील यांनी आभार मानले. यावेळी जायंट्स परिवारातील सदस्य उपस्थित होते.