देवगडातील खलांशांच्या अज्ञात आजाराचे गूढच!
आरोग्य विभागाचे होतेय दुर्लक्ष : चार रुग्ण दगावले तरी निदान नाही
पालकमंत्री, जिल्हाधिकारी गांभिर्याने घेतील का?
सोळापैकी चार खलांशांचा मृत्यू- 20एप्रिल,22 एप्रिल, 6 मे, 14 मे
प्रशांत वाडेकर / देवगड:
देवगड बंदरातील खलाशांचे अज्ञात आजारामुळे होत असलेले मृत्यू हे चिंतेची बाब ठरत असून आरोग्य विभागाला मात्र कोरोनापुढे या खलाशांच्या आजाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. पाय सुजण्याच्या या विशिष्ट आजाराने आतापर्यंत चार खलाशांचा मृत्यू झाला असून अद्यापही आरोग्य विभागाला निदान करता आलेले नाही. कोरोना बरोबरच या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या आजाराचे तातडीने निदान होणे आवश्यक आहे अन्यथा खलाशांच्या मृत्यूची संख्या वाढत जाण्याची भीती आहे. आरोग्य विभागाच्या होत असलेल्या दुर्लक्षाकडे पालकमंत्री व जिल्हाधिकारी लक्ष देतील का? असा सवाल मच्छीमार करीत आहेत.
देवगड बंदरामध्ये मासेमारी करणाऱया बोटींवर ओडिसा, कर्नाटक व नेपाळ येथील खलाशी काम करण्यासाठी असतात. हे खलाशी कायमच बोटींवर राहत असतात. या बोटींवरील खलाशांना गेल्या महिन्यामध्ये अज्ञात आजाराने मृत्यूच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. या खलाशांच्या पायाच्या ढोपराखाली भागाला सूज येते. पायाला इतकी सूज येते की तो पायावर उभा देखील राहू शकत नाही. तसेच त्याच्या किडनी व लिव्हरला त्याचे इन्फेक्शन होऊन यामध्ये मृत्यू होण्याची घटना घडत आहे. गेल्या महिनाभरात चार खलाशांचा या विशिष्ट आजाराने मृत्यू झाला आहे. या बाबत आरोग्य विभागाला अद्यापही निदान करता आलेले नाही व त्यांच्यावर योग्य उपचारही करता आलेले नाही. देवगड येथे या रुग्णांवर उपचार न करता त्यांना थेट जिल्हा रुग्णालयात पाठविले जात आहे. जिल्हा रुग्णालयातून 15 दिवसांपूर्वी पाच खलाशांना कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार झाले नाही. त्यामुळे कोल्हापूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार झाले. त्यातून ते पाच खलाशी बरे होऊन परतले मात्र, अद्यापही या आजाराचे निदान कोणालाही करता आलेले नाही.
सर्वच टेस्ट निगेटिव्ह
मच्छीमार व्यावसायिक द्विजकांत कोयंडे यांनी सांगितले की, या खलांशांच्या सर्व प्रकारच्या टेस्ट करून पाहिल्या मात्र रिपोर्ट निगेटिव्ह येतो. रक्तातही दोष आढळून येत नाही. बंदरातील चार ते पाच बोटींवरील खलाशांना या आजाराने ग्रासले आहे. खलाशांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नाही. त्यांना कुठलाही आजार झाला तर तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जातो. देवगड ग्रामीण रुग्णालयातील डॉ. भगत यांनी दारुच्या व्यसनामुळे पाय सुजत असल्याचे सांगितले. मात्र, या खलांशांमध्ये काहीजणांना दारुचे व्यसन आहे तर काहींना दारुचे व्यसन नाही. तरी देखील त्यांना हा आजार आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या या निदानात तथ्य नाही.
धान्याच्या नमुन्याचा अहवालच नाही
जिल्हा आरोग्य विभागाने खाण्यातून इन्फेक्शन होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला. मात्र, सर्व खलाशांसाठी वेगवेगळय़ा ठिकाणी धान्य खरेदी केले जाते. जर एकाच ठिकाणी धान्य खरेदी केले जात असते तर कदाचित धान्यातील दोष म्हणता आला असता. धान्याचे नमूने तपासणीसाठी घेऊन गेले त्याचा अहवाल अद्यापही आलेला नाही. त्यामुळे आरोग्य विभाग या खलाशांच्या आजाराकडे गांभिर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे.
निदानच नाही तर उपचार कसे होणार
या खलाशांच्या आजाराचे अद्याप निदान झालेले नाही. जर निदानच होत नसेल तर उपचार तरी कसे होणार? जे उपचार होत आहेत त्यातून खलाशी तात्पुरते बरे होतात. कोल्हापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर योग्य उपचार झाले. मात्र, निदान झालेले नसल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा याबाबत गांभिर्याने का घेत नाही. मृत होणारे खलाशी हे परराज्यातील व परदेशातील आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचे मृतदेह देखील त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचत नाहीत, हे वास्तव आहे.
महिनाभरात झालेले खलाशांचे मृत्यू
खलांशांच्या मते ही तर पांढरी कावीळ
या आजाराला काही खलाशी हे पांढरी कावीळ असे म्हणतात. कर्नाटक व केरळ या भगातील खलाशी या आजाराला पांढरी कावीळ झाल्याचे सांगत याच्यावर कर्नाटक राज्यात आयुर्वेदिक उपचार केले जातात. लॉकडाऊनमुळे हे खलाशी जाऊ शकत नसल्याने त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. मच्छीमार नेते भाई खोबरेकर म्हणाले, गेल्या पाच वर्षात अशा प्रकारचे रुग्ण आढळून येत आहेत. जेव्हा त्यांचे पाय सुजण्याचे प्रकार होतात, तेव्हा त्यांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जायचे. तेथे हे खलाशी आयुर्वेदीक उपचार करतात. त्यानंतर पुन्हा बोटीवर काम करण्यासाठी येतात.