अजिंक्यताऱयाकडून पोलीस दलाला सॅनिटाईझर : प्रशासनाला सहकार्य करण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना हे जगावर आलेले भयंकर संकट आहे. आपल्या देशातही कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोना जात-पात, धर्म, गरीब-श्रीमंत असा भेदभाव करत नाही. या मानवतेवर आलेल्या संकटासाठी कोणा एका व्यक्तीला अथवा धर्माला कोरोनासाठी जबाबदार धरणे योग्य नाही. कोणीही जातीय तेढ निर्माण करू नये. आपण सर्वांनी एकोप्याने राहून कोरोनाला हरवायचे आहे. त्यासाठी घरात राहून कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यास प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.
पोलिसांना कोरोना होण्याचा जास्त धोका असून कोरोनापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेले हॅन्ड सॅनिटायझर कारखान्यातर्फे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना भेट देण्यात आले. याप्रसंगी आवाहन करताना आमदार शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी हरीश पाटणे, विनोद कुलकर्णी, फिरोज पठाण आदी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. देशभरात लॉकडाऊन घोषित केला असून त्याची अंमलबजावणी पोलीस दलामार्फत केली जात आहे. एकमेकांच्या संपर्कात न येणे, गर्दी न करणे हेच उपाय कोरोनापासून आपल्या सर्वांचे संरक्षण करणार आहेत. त्यासाठी पोलीस यंत्रणा दिवस रात्र झटत आहे. पोलीस आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत.
पोलीस हा सुद्धा माणूसच आहे आणि त्यालाही कुटुंब आहे. त्यामुळे आपल्या पोलीस बांधवांची काळजी घेणे ही सर्वांचीच सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे संचारबंदीचे कोणीही उल्लंघन करू नये. आपल्या रक्षणासाठी झटणाऱया प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. कोणीही गर्दी करू नये. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये आणि कोरोना विरोधातील लढाई जिकंण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे यांनी केले.
पोलीस हा देखील एक माणूसच असतो
महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला आहे. कोरोनापासून बचावासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल दिवसरात्र आटोकाट प्रयत्न करून जनतेचे रक्षण करत आहे. कोरोना कोणालाही होऊ शकतो, अशा गंभीर परिस्थितीतही पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी अहोरात्र रस्त्यावर उभा असलेला पोलीस हा देखील एक माणूसच आहे, याचे भान जनतेने ठेवावे, असेही आमदार शिवेंद्रराजे यावेळी म्हणाले.