मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विरोधातील लढाई आम्ही जिंकूच असा आत्मविश्वास व्यक्त करीत राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस एक पण त्याचे परिणाम अनेक असल्याचे जाणवत आहे.
कोरोना व्हायरस या दोन शब्दांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. चीनपासून याच्या फैलावाला सुरुवात झाली. आज जगभरात कोरोनाचा फैलाव झाला आहे. आतापर्यंत जगभरात तब्बल 29,42,575 पॉझिटिव्ह रुग्ण असून 2,03,884 निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. भारतात 26,917 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर 826 जणांचा बळी गेला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे 8068 पॉझिटिव्ह रुग्ण असून आतापर्यंत 342 जणांचे बळी गेले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत कोरोनाने सर्वात जास्त थैमान घातले आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनाचे 5407 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर 204 जणांचा बळी गेला आहे. जगातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारत सरकारने प्रथम 22 मार्चला जनता कर्फ्यू आणि नंतर 24 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत आणि पुढे 3 मे पर्यंत लॉकडाऊन पुकारल्याने आणि युद्धपातळीवर खबरदारी घेत काही उपाययोजना केल्याने कोरोना तसा नियंत्रणातच असल्याचे बोलले जात आहे. मात्र संपूर्ण नियंत्रणात नाही.
या व्हायरसमुळे संपूर्ण जगातील कारभार, कामकाज, उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. जगाचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अगोदर कोरोनाला संपूर्णपणे आटोक्यात कसे आणावे, त्याचा कायमचा बंदोबस्त कसा करावा याचे जगातील बलाढय़ देशांना टेन्शन आले आहे. तसेच कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यवसाय, बाजारपेठा, सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प होऊन त्यामुळे झालेले मोठे आर्थिक नुकसान कसे भरून काढायचे, देशाचा कारभार कसा करायचा, जनतेची काळजी कशी घ्यायची, त्यांना रोजगार आणि अन्न कसे पुरवायचे हे कोरोना असतानाचे प्रश्न कोरोना गेल्यानंतर तर अधिकपटीने आ वासून उभे राहणार आहेत. नुसत्या विचारानेच डोके सुन्न झाले आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडेपर्यंत प्रत्येक देशात आर्थिक संकट उभे ठाकणार असून ते प्रत्येकाच्या घराघरात पोचणार आहे. तोपर्यंत संपूर्ण जगात कित्येक लाखापर्यंत तरी बळी गेलेले असतील. त्यामुळे प्रत्येक देशाला कोरोना असेपर्यंत, कोरोना जाईपर्यंत आणि कोरोना गेल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जगायचे कसे याचा कृतीआराखडा आतापासूनच तयार करावा लागणार आहे. नव्हे कोरोनाचे संकट डिसेंबरपर्यंत चीनमध्ये असताना ज्या ज्या देशांनी त्याकडे जवळजवळ दुर्लक्षच केले त्या त्या देशांना आज कोरोनाने त्यांच्या देशाच्या उंबरठय़ावर येऊन आणि देशात थेट प्रवेश करून थैमान घातल्यानंतर एक चांगलाच धडा दिला आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच खरी व गंभीर आहे की, चीनमध्ये डिसेंबरमध्ये कोरोना थैमान घालत असतानाच जगभरातील देशांनी जर कोरोना आपल्या देशात आला तर काय करायचे याबाबत एक कृती आराखडा अगोदरच तयार केला असता व त्यावर अंमलबजावणी सुरू केली असती तर आज लाखो लोकांचे बळी गेले नसते आणि परिस्थिती वेगळीच बघायला मिळाली असती.
कोरोनावरून राजकारण?
मुंबईत व महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव देशातील इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. विशेषत: मुंबईत कोरोनाचा फैलाव जास्त झाला आहे. राज्य सरकार, मुंबई महापालिका या कोरोनाला रोखण्यासाठी दिवसरात्र विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जीवाचे रान करीत आहेत. राज्याला व मुंबईला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी किट, डॉक्टर, नर्स, कर्मचारी, वार्डबॉय यांची कमतरता भासत आहे. मात्र त्यावर भाजपचे नगरसेवक तुटून पडले असून त्यांनी पालिकेच्या या त्रुटींवर सतत बोट ठेवणे सुरू केले आहे. कोरोनाबाबत काय चुका घडतात, काय सुधारणा व्हायला हव्यात यावर बोट ठेवत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उपदेश दिले आहेत. तर भाजप कोरोनावरून राजकारण करत असल्याची चर्चा शिवसेना गोटात ऐकायला मिळत आहे. वांद्रे येथील परप्रांतीय मजुरांनी भरदिवसा हजारोंच्या संख्येने अचानक गर्दी करून आम्हाला घरी जाऊ द्या, अन्न नको रेशन धान्य द्या, अशी एकमुखी मागणी करण्यामागे मोठे राजकारण असल्याची उघड चर्चा आहे. कारण, एका वफत्तवाहिनीने परराज्यात जाण्यासाठी रेल्वे गाडय़ा सोडण्यात येणार असल्याची बातमी दाखवली आणि हे हजारो परप्रांतीय एकत्र येणे आणि त्यांच्या हातात बॅग, सामान नसणे म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असा की यामागे हमखास राजकारण आहे. त्यांनी राज्य सरकारला दोष देणे आणि त्यांची बाजू भाजपच्या काही नेत्यांनी एकदम उचलून धरणे आणि सरकारला टार्गेट करणे यामागे राजकारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते. तसेच उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात आमदार होणे बंधनकारक असून राज्यपालांकडे राज्य मंत्रिमंडळाने उद्धवजी यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र हे पत्र देऊन आज 15 दिवसांपेक्षाही जास्त कालावधी लोटला तरी राज्यपाल त्यावर निर्णय घेत नसल्याने त्यावर अनेक राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवत यामागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे.
पालघर येथे दोन साधुंची जमावाने हत्या केल्याने त्यावरूनही महाराष्ट्रात, देशात राजकीय पडसाद उमटले. पेंद्राने राज्याकडे विचारणा केली. देशातील साधू, संत यांनी महाराष्ट्र सरकारवर नाराजी व्यक्त करीत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. अद्यापही त्यावरून राजकारण सुरूच आहे. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पेंद्रीय पथकाने मुंबईत भेट देऊन पाहणी केली व एप्रिल अखेरपर्यंत 46 हजार तर मेपर्यंत 6 लाख 56 हजार कोरोना रुग्ण वाढण्याची खळबळजनक शक्यता व्यक्त केल्याने राज्यासह देश हादरला आहे. खरेच तसे घडेल का, असा प्रश्न निर्माण झाला आह मुंबईत रुग्णांसाठी व्यवस्था कमी पडणार असून परिस्थिती विदारक होण्याची शक्यताही या पथकाने व्यक्त केली. मात्र राज्य सरकारने या पथकाने व्यक्त केलेली शक्यता साफ फेटाळून लावली आहे. उलट आताच कोरोनाची परिस्थिती काहीशी आटोक्यात येत असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तर कोरोना विरोधातील लढाई आम्ही जिंकूच असा आत्मविश्वास व्यक्त करीत राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस एक पण त्याचे परिणाम अनेक असल्याचे जाणवत आहे.
मारुती मोरे