प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हयातील कोरोना रूग्णांची आताची संख्या, तसेच बरे झालेले रुग्ण या सगळयांचा विचार करता जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण राखण्यात यश मिळविले आहे. पोलीसांकडून लॉकडाऊन व नाकाबंदीची कडक अंमलबजावणी व प्रशासनाचे योग्य नियोजन यामुळे हे साध्य झाल्याचे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांनी केले.
विविध खात्यांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी ते रत्नागिरीच्या दौऱयावर आले होते. यावेळी गृह विभाग, उत्पादन शुल्क, पणन, कौशल विकास विभागासह रत्नागिरी जिह्यातील कोव्हीड-19 च्या स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हय़ात योग्य नियोजन झाल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासन आणि गृहविभागाच्या समन्वय व एकत्रीत प्रयत्नांचे हे यश असून पोलिसांनी आपली जबाबदारी उत्तमपणे सांभाळली आहे. रत्नागिरी जिह्याची भौगोलिक स्थिती आणि मुंबई-पुण्याशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभुमीवर नाकेबंदी व अन्य नियमांचे काटेकोर अंमलबजावणी केल्याचे सांगत पोलीस दलाचे त्यांनी कौतुक केले.
जिल्हाधिकारी सभागृह येथे कोव्हिड 19 प्रादुर्भाव व त्याअनुंषगाने केलेल्या उपाययोजना बाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्र. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस. माने, प्र.जिल्हा शल्य चिकीत्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट पान 1 ला
त्या कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवा
आमदार राजन साळवी यांनी यावेळी खेर्डीमधील एका कंपनीत विनापरवानगी आलेल्या 47 कामगारांचा मुद्दा मांडला. यावर विनापरवाना आलेल्या व सोशल डिस्टन्सींगसह अन्य नियम मोडणाऱया या कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याचा सूचना देसाई यांनी पोलिस अधिकाऱयांना दिल्या.
क्वारंटाईनमध्ये योग्य सुविधा पुरवा
शंभुराज देसाई म्हणाले जिल्हा कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन चांगल काम करत आहे. बाहेरुन आलेल्या व होम क्वारंटाईन झालेल्या नागरिकांवर जादा नजर ठेवा. संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्धतेबाबत खबरदारी घ्या. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी जास्त डॉक्टरांची नेमणूक करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सिव्हीलमध्ये मुबलक औषधे
सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये औषधाचा मुबलक पुरवठा असून आवश्यक साधनसामुग्री सुद्धा उपलब्ध आहे. कर्मचारी व डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी स्थानिक पातळीवर मुलाखती घेऊन पदे भरली जाणार आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याला तत्वतः मान्यता दिली असल्याचे त्याने सांगितले. मात्र पद भरतीच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी मान्य केले.
कोव्हीडसाठी 8 कोटी मंजूर
रत्नागिरी जिह्यात कोव्हीड-19 साठी आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पाच कोटी पाच लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. अद्यापही दोन कोटी 95 लाख रुपये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हास्तरावर औषधे खरेदी करण्यात आली आहे. मात्र महागडी औषधांची मागणी राज्यस्तरावर करण्यात आली असून ती लवकरच प्राप्त होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
कौशल्य विकासाचा लवकरच आराखडा
जिह्यातील कोरोना केअर सेंटरमधील गैरसोय आणि असुविधांची दखल त्यांनी घेतली. रत्नागिरीतील कौशल्य विकास विभागासाठी 3 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, योग्य आराखडा तयार करणे आवश्यक आहे. यातून विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी आवश्यक तरतूद केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य उत्पादन कामगिरी विषयी बोलताना मनुष्यबळ अभावी या विभागाला काम करण्यात अडचणी आल्या तरी आहे त्या मनुष्यबळात या विभागाने समाधानकारक काम केले आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांबाबत अद्याप निर्णय नाही
लॉकडाऊनच्या कालावधीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. अभ्यासपूर्ण आढावा घेतल्यावरच याविषयी जिल्हाधिकारी निर्णय घेतील. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांच्या आगमनाबाबत कोणताही निर्णय झाला नसून जो निर्णय होईल ते येंग्य व विचारपूर्वकच घेईल.