प्रतिनिधी/ सातारा
गेल्या महिन्यात कोरोना बाधितांचे प्रमाण घटले होते. मात्र ऐन दिवाळी सणात नियमांची पायमल्ली झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या लाटेला सामोरे जाण्यासाठी आढावा बैठका सुरू केल्या आहेत.
मार्च महिन्यात दाखल झालेल्या कोरोनाने जून, जुलै महिन्यात कहर केला. रूग्णांची संख्या जास्त आणि बेड ची संख्या कमी अशी अवस्था झाली होती. बेड मिळत नसल्याने प्रशासनावर ताशेरे ओढले जात होते. मृत्यूचेही प्रमाण वाढल्याने कोरोनाची धास्ती निर्माण झाली होती. दररोज हजाराच्या घरात बाधितांची संख्या पोहचत होती. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रशासनापुढे आवाहन निर्माण झाले होते. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घालुन दिलेल्या नियमांचे पालन केल्याने गेल्या महिन्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाली. मात्र दिवाळी नंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कमी झालेली बाधितांची संख्या पुन्हा वाढु लागली आहे. दुसरी लाट येण्याअगोदरच उपाययोजना कशा पद्धतीने केल्या जातील यांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.
जिह्यात अनेक ठिकाणी कोरोना सेंटर बंद पडली आहेत. ही सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने संबंधित कोरोना सेंटरना पत्रव्यवहार सुरू केला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी व अधिकाऱयांच्या वारंवार बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये सध्या कोरोनाचा मृत्यूदर कसा कमी होईल. यावर चर्चा आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. सिव्हिलमध्ये बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची संख्या पुरेशी आहे का ? याचाही आढावा घेतला जात आहे. वेळ पडल्यास आणखी किती कोरोना सेंटर उभारावे लागतील. त्यासाठी येणारा खर्च यांचीही चाचपणी प्रशासनाकडून केली जात आहे.