प्रतिनिधी/ रत्नागिरी :
जिल्हा बंदी असतानाही आंबा वाहतुकीच्या गाडीतून दोन कोरोना पॉझिटीव्ह महिलांना रत्नागिरीत आणणाऱया टेम्पोचालकाचा शोध लागला आहे. या टेम्पोचालकासह त्याला मदत करणाऱयाला व बेकायदेशीर प्रवास करणाऱया कोरोनाबाधीत महिलांवरही ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. केवळ 1 हजार रूपयांसाठी प्रवासी घेणे या टेम्पोचालकाला चांगलेच महागात पडले आहे.
कुवारबाव-गराटेवाडी येथील टेम्पोचालक कृष्णा विराप्पा सुरणकर व त्याचा सहकारी रफिक मुल्ला (एमआयडीसी) या दोघांनाही पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा बंदी करण्यात आली आहे. मात्र आंब्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी पास देण्यात आले आहेत. या पासद्वारे मुंबईत आंबा वाहतुक करणाऱयांकडून येताना बेकायेदशीररित्या प्रवासी वाहतूक होत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत.
असाच प्रकार या दोन महिलांच्याबाबत घडला आहे. मुंबईतील वडाळा येथून 2 महिला आंबा वाहतुकीच्या टेम्पोतून 8 मे रोजी रत्नागिरी-माळनाका येथे उतरल्या होत्या. मुंबईतून आल्यामुळे स्वतःच त्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांचे नमुने कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या टेम्पोचालकाचा शोध सुरु झाला. या बाबत त्या महिलांनी सुरुवातीला सहकार्य केले नाही. मात्र 2 दिवसांनी तो टेम्पो कुवारबावचा असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली.
टेम्पोचालक कृष्णा विराप्पा सुरणकर आणि त्या महिलांना आणण्यासाठी मदत करणारा रफिक मुल्ला या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या या प्रकारामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आणि संचारबंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुरणकर हा मुंबईतून आंबे वाहतूक करतो. 1 हजार रुपये भाडय़ासाठी त्याने हा प्रताप केल्याचे पुढे आले आहे. पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले.