प्रतिनिधी/ फलटण
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लागू केलेलेल्या संचारबंदीच्या काळात फलटण शहरात फलटण नगरपरिषद व अन्य दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून दररोज साडेचारशे जणांना अन्न पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस या संस्थेत वाढ होत असून नागरिकांनी या कामी मदत करावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये. याकरीता संपूर्ण देशात संचारबंदी व 144 कलम लागू करण्यात आली आहे. यामुळे फलटण शहरातील दररोज रोजंदारी करणारे कामगार, हमालीचा व्यवसाय करणारे, शहरातील भिक्षुक व बेघर कुटुंब, इतर शहरातून येणारे प्रवासी यांची उपासमार होत आहे. ती उपासमार होऊ नये, याकरीता त्यांना अन्न शिजवून वाटप करण्याचे काम फलटण नगरपरिषद करीत आहे. या कामी फलटण नगरपरिषदेच्यावतीने दररोज दोनशे लोकांचे तर हॉटेल ब्रम्हाच्या माध्यमातून अभिजित भोसले अडिचशे लोकांना अन्न शिजवून त्यांना घर पोहोच अन्न पुरवठा केला जात आहे. याकामी फलटण नगरपरिषदेच हॉटेल विसावाच्या माध्यमातून हॉटेल मालक प्रभाकर पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.
सदर अन्न वाटप फलटण शहरातील घडसोली मैदान, एस. टी. स्टॅंड, नगर परिषद कार्यालय, दवाखाने व शहर व परिसरातील गरजूंना दैनंदीनपणे होत आहे. अन्न पुरवठा कराव्या लागणाऱया संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून या कामी फलटण शहरातील दानशूर व्यक्ती, व्यापारी, ठेकेदार, वैद्यकीय व्यवसायिक, सामाजिक संस्था, व ज्या नागरिकांना स्वच्छेने मदत करावयाची आहे, त्यांनी पुढे येऊन सढळ हाताने धान्य, भाजीपाला, किराणा माल, तेल, साखर, रवा, तांदूळ इत्यादी स्वरूपात मदत करावी. असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. सदर मदत महाराजा मंगल कार्यालय स्विकारली जाणार आहे. तसेच गरजेनुसार महाराजा मंगल कार्यालय येथेही अन्न शिजवण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती काटकर यांनी दिली आहे.