प्रतिनिधी / सांगरुळ
कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी व महापुराचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे. असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील (सडोलीकर) यांनी केले आहे.
सध्या देशात आणि जगातही कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांना उपचारासाठी बेडची कमतरता भासत आहे. तरीही राज्यातील आघाडीचे सरकार आणि आम्ही लोकप्रतिनिधी रुग्णांवर वेळेवर उपचार होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असून सर्वांनी मास्क सॅनिटायझर यांचा वापर करावा व जरूरीच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच सोशल डिस्टन्स पाळावे. नागरिकांनी कोरोनाविषाणूच्या संसर्गाची लक्षणे जाणवताच ताबडतोब वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. प्रशासनाकडून वेळोवेळी केले जाणार्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन आमदार पी. एन. पाटील यांनी केले आहे.
जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असून या धरणांतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत असून महापुरापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वेळीच दक्ष राहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. प्रशासनानेही उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली असून प्रशासनाच्या आवाहनास नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी मनामध्ये अवास्तव भीती न बाळगता प्रशासनाने सुचवलेल्या उपाययोजनांचा जागरूकपणे अवलंब करून स्वतः कुटुंबाची काळजी घेत संकटाशी मुकाबला करावा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगत नागरिकांना धीर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.