मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा ममतांचा प्रयत्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील कोरोनाबाधितांचे प्रमाण ( कोविड-19 संकेतस्थळानुसार) आता 5 लाख 73 हजार 598 पोहोचले आहे. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विविध राज्यांनी 6,062 नव्या रुग्णांची पुष्टी दिली आहे. तर सोमवारी 18 हजार 339 नवे रुग्ण सापडले होते आणि 13 हजार 497 बाधितांना संसर्गापासून मुक्तता मिळाली होती. तामिळनाडूत संसर्ग वेगाने वाढत आहे. मागील 24 तासांमध्ये तेथे विक्रमी 3,949 रुग्ण वाढले असून ही संख्या सलग 5 व्या दिवशी 3,500 पेक्षा अधिक राहिली आहे. सर्वाधिक बाधितांच्या राज्यांच्या यादीत तामिळनाडू आता दुसऱया स्थानावर पोहोचले आहे. तर सोमवारी देशात 417 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
पश्चिम बंगाल सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कोलकाता शहरात अत्यावश्यक पुरवठय़ासाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्याची अनुमती मागितली आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमधून येणाऱया देशांतर्गत उड्डाणांवर 6 जुलैपासून दोन आठवडय़ांपर्यंत बंदी घालण्याची मागणी केली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, सूरत, अहमदाबाद, नागपूर आणि इंदोरमधून पश्चिम बंगालसाठी कुठलीच विमानसेवा सुरू केली जाऊ नये असे पश्चिम बंगाल सरकारने म्हटले आहे.
तर गुजरात सरकारने दुकाने आणि रेस्टॉरंट्स अधिक काळापर्यंत खुली ठेवण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात आता दुकाने 7 ऐवजी रात्री 8 वाजता बंद होतील. रेस्टॉरंटही रात्री 8 ऐवजी 9 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात कोरोनावरील लस तयार झाल्यावर त्याच्या लसीकरणाच्या तयारीसंबंधी एक बैठक मंगळवारी घेतली आहे. यात भारत आणि जागतिक स्तरावर निर्माण होणाऱया लसींच्या सद्यस्थितीसंबंधी चर्चा करण्यात आली. कोविडविरोधात लसीकरणाच्या प्रयत्नांमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. अत्यंत उत्तम प्रकारे आणि योग्यवेळेत लसीकरण करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना मोदींनी अधिकाऱयांना केली आहे.
मागील 24 तासांमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या 53 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4 जवानांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. बीएसएफमध्ये आता एकूण 354 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 659 जवान संसर्गातून बरे झाले आहेत. 29 जूनपर्यंत 86 लाख 8 हजार 654 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 2 लाख 10 हजार 292 नमुन्यांची सोमवारी चाचणी करण्यात आल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार मागील 24 तासांमध्ये 18 हजार 522 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 418 जणांचा मृत्यू झाला आहे.