6 हजार 977 ची वाढ, मृत्यूंची संख्या 4 हजार पार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रविवार संध्याकाळ ते सोमवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये भारतात कोरोना रूग्णसंख्येत 6 हजार 977 ची भर पडली असून हा आतापर्यंतचा एकदिवसीय उच्चांक आहे. अशा प्रकारे बाधितांची एकंदर संख्या 1 लाख 38 हजार 845 झाली आहे. आतापर्यंत 57 हजार 720 रूग्ण बरे झाले असून त्यांचे प्रमाण एकंदर रूग्णसंख्येच्या 41.45 टक्के असल्याची माहिती देण्यात आली.
या चोवीस तासांच्या कालावधीत एकंदर 154 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैकी सर्वाधिक 58 महाराष्ट्रातील आहेत. दिल्ली 30, गुजरात 29, मध्यप्रदेश 9, तामिळनाडू 8, उत्तर प्रदेश 6, तेलंगणा 4, राजस्थान 3, पश्चिम बंगाल 3, बिहार 2, पंजाब 1 व उत्तराखंड अशी इतर काही राज्यांमधील एक दिवसातील मृतांची संख्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मृत्यूंमध्येही महाराष्ट्र प्रथम
आतापर्यंत कोरोनाचे एकंदर 4 हजार 21 रूग्ण असून त्यापैकी 1,635 महाराष्ट्रात आहेत. त्यापाठोपाठ गुजरात 848, मध्यप्रदेश 290, पश्चिम बंगाल 272, दिल्ली 261, राजस्थान 163, उत्तर प्रदेश 161, तामिळनाडू 111 आणि आंध्र प्रदेश 56 अशी इतर काही राज्यांमधील मृतांची संख्या आहे.
बरे होण्याचे प्रमाण वाढले
कोरोनाबाधेपासून बरे होण्याचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. आतापर्यंत 57 हजार 720 रूग्ण बरे झाले असून त्यांचे एकंदर रूग्णांच्या तुलनेत प्रमाण 41.57 टक्के आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चांगली वाढ दिसून आल्याने प्रशासनाचा तसेच लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
पीपीई किट उत्पादनात भारत दुसरा
कोरोनाचा उदेक होण्यापूर्वी भारतात एकाही पीपीई किटचे उत्पादन होत नव्हते. मात्र गेल्या अडीच महिन्यांमध्ये भारताने या उत्पादनात भरारी घेतली असून आता जगातील दुसरे स्थान पटकाविले आहे. देश आता पीपीई किट निर्यात करण्याच्या परिस्थितीत असून गेल्या 75 दिवसांमध्ये चार लाखांहून अधिक किटस् तयार करण्यात आले असून प्रतिदिन 10 हजार किटस्ची त्यात भर पडत आहे. आतापर्यंत ही किट्स आयात करण्यात येत होती. तथापि देशात तेवढय़ाच गुणवत्तेची किटस् निम्म्याहून कमी किमतीत बनविण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात परकीय चलन वाचले, अशीही माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.