लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका – जिल्हाधिकारी
प्रतिनिधी / कोल्हापूर
सध्या कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे `नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी गांभिर्याने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे दिले. दरम्यान, कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री पाटील अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत काटेकोर उपाययोजना करायला हव्यात. राज्याला कोल्हापूरने दिलेली `नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. सर्वांनीच दक्षता घेतली पाहीजे. मागील अनुभव पाहता आपण सर्वांनी काळजी घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी. गांभिर्याने सर्व क्षेत्रातील प्रमुखाने याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी यंत्रणा सज्ज ठेवून कोल्हापूर कोरोनामुक्त ठेवू.मागील वर्षी अतिशय शिस्तबध्द यंत्रणा राबविली होती. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक तयारीवर भर द्यावा लागेल. `मास्क नाही तर प्रवेश नाही’ हा फलक लावून त्याची अंमलबजावणी हवी. प्रवासी क्षमतेनुसार, नियमानुसार वाहतूक हवी. मास्क हवाच, अनिर्बंध्द वाहतूक नको. 50 टक्के क्षमतेनुसार हॉटेल चालवावेत.
लॉकडॉऊनची वेळ येवू देऊ नका
स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी टाळावी, मास्कचा वापर हवा, पॉस मशिनसाठी सॅनिटायझर वापरा. लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात कामगारांनी उपचारासाठी गेलं पाहीजे. खासगी रुग्णालयांनी मागील बेडची संख्या तपासून तयारी ठेवावी, आरोग्य कर्मचायांचे लसीकरण व्हायला हवे. मास्क शिवाय एसटीत प्रवासी नसावा याबाबत वाहकांना सूचना द्यावी. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांनाही मास्क हवा. मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी दक्ष राहून नियमांचे काटेकोर पालन करावे, या नियमांचे उल्लंघन करुन लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला.
ज्येष्ठांना लसीकरणास नेऊन श्रावणबाळ व्हा- संजयसिंह चव्हाण
45 वर्षावरील बाधित तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर नेऊन त्यांचे लसीकरण 31 मार्च पूर्वी पूर्ण करावे आणि तरुणांनी आधुनिक श्रावणबाळ व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
लस सुरक्षिततेबाबत डॉक्टरांनी फलक लावावेत : संजयसिंह चव्हाण
खानावळी आणि हॉटेलमध्ये बैठक रचनेत बदल करावा. समोरासमोर बसण्याऐवजी भिंतीकडेला तोंड करुन जेवण्यासाठी बसवावे. खासगी रुग्णालयात `मी लस घेतली आहे, लस सुरक्षित आहे, ती आपणही घ्यावी’ असे फलक डॉक्टरांनी लावावेत, असे निर्देश संजयसिंह चव्हाण यांनी दिले.
लॉकडाऊन, संचारबंदी नको तर प्रत्येकाने काळजी घ्या : पोलीस अधीक्षक
लॉकडाऊन, संचारबंदी नको असेल तर प्रत्येकांनी स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेतली पाहीजे. नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. त्याचे प्रबोधनही करावे. प्रशासनास मदत करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्यासह रिक्षा संघटना, नाभिक संघटना, हॉटेल मालक संघटना, रेशन दुकान संघटना, सिनेमागृह संघटना, क्रिडाई, चेंबर ऑफ कॉमर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, पेट्रोल पंप असोसिएशन, एलपीजी असोसिएशन, रिलायन्स मॉल, स्टार बझार, मार्केट यार्ड आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.