आंबर्डे धरण भरण्याची आशा, शेतकरी वर्गांतून समाधन
युवराज भित्तम / म्हासुर्ली :
गत आठवड्यात सलग तीन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे धामणी नदी जानेवारी महिन्यात पुन्हा प्रवाहीत झाली असून नदीवरील सर्व मातीचे बंधारे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत.परिणामी पाटबंधारे खात्याच्या गलथान कारभारामुळे गेल्या दोन महिन्यापासून कोरडा पडत चाललेला आंबार्डे (ता.पन्हाळा) येथील बंधारा पाण्याने भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
प्रामुख्याने धामणी खोरा राधानगरी,पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात विभागलेला आहे. पावसाळ्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुरस्थिती गंभीर होऊन येणारे बेटाचे रुप,तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईने होरपळणारा धामणी खोरा शासनाच्या उदासिन धोरणाचा बळी ठरत आलेला आहे. त्यामुळे गेली २०- २२ वर्षे येथील अपुऱ्या धामणी मध्यम प्रकल्पाचे भिजत घोंगडे शासन दरबारी अडकून पडले आहे.
धामणी खोऱ्यातील शेतकरी कष्टाळू असल्याने पाणीटंचाई बरोबर दोन हात करत व कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ऐन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात धामणी नदी वर मातीचे बंधारे उभारून पावसाचे पाणी साठवूण ठेवतात. आणि या पाण्यावरच ऊसा सारखी नगदी पिकाची शेती कसतात.
नदीवर खेरीवडे, म्हासुर्ली,गवशी, पणोरे,आंबर्डे, सुळे येथे कोल्हापूर कोल्हापूर पद्धतीचे शासकीय बंधारे आहेत.मात्र सदर बंधारे गळके असल्यामुळे येथील शेतकरी प्रत्येक वर्षी स्वखर्चाने लाखो रुपये खर्च करुन मातीचे समांतर बंधारे घालतात.तसेच इतर काही ठिकाणी ही नदीवर शेतकरी मातीचे बंधारे उभारून पाणी करतात.
मात्र यावर्षी नदीच्या वरील भागातील शेतकऱ्यांनी लवकरच बंधारे घातल्याने पाणी वरतीच अडकून पडले आहे.परिणामी पाटबंधारे विभागाच्या आंबर्डे,पणोरे येथील बंधाऱ्यामध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही.या वर पर्याय म्हणून पाटबंधारे विभागाने आंबर्डे बंधाऱ्या पर्यत पाणी आणण्यासाठी गत महिन्यात २४ ते २७ डिसेंबर पर्यत नदीवरील पाणी उपसा बंदी करून एक प्रकारे वरातीमागून घोडे हाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
मात्र गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने धामणी खोऱ्यात सलग तीन दिवस हजेरी लावली. त्यामुळे जलस्त्रोत्रात वाढ झाल्याने वरील बंधारे तुडूंब भरल्याने धामणी नदी पुन्हा प्रवाही झाली आहे.सध्या खेरीवडे,धुंदवडे,म्हासुर्ली,गवशी, येथील बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.अशाच प्रकारे धामणी नदी काही दिवस प्रवाहीत राहिल्यास पणोरे,आंबर्डे येथील बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा होण्याच्या शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या असून एक प्रकारे निसर्गा शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
पाऊस आणि उपसा बंदी..!
पाटबंधारे खात्याच्या गलथान कारभारामुळे आंबर्डे बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे पणोरे, बळपवाडी, हारपवडे,वेतवडे,निवाचीवाडी, आंबर्डे परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला होता. मात्र गेल्या आठवड्यात धामणी खोऱ्यात आवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने नदीवरील कृषी पंप बंद आहेत. तसेच वरील बंधाऱ्यातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने नदी पुन्हा वाहू लागली आहे. याच संधीचा फायदा पाटबंधारे विभागाने घेऊन १२ ते १५ जानेवारी दरम्यान पाणी उपसा बंदी आदेश काढला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद ठेवला आहे.