तरुण भारत सोशल मीडिया’ वर प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे कुटुंबांना मिळाला मदतीचा हात
प्रतिनिधी / इचलकरंजी
ऊस तोडणीच्या निमित्ताने आलेल्या येथील दोन कुटुंबावर काल मोठे संकट कोसळले. काल दुपारी झोपडीला लागलेल्या आगीत त्यांचे संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. हंगाम संपून परतीच्या तयारीत असताना आगीत साहित्याची राखरांगोळी झाली. मात्र या दोन्ही कुटुंबांना आज दातृत्वाची पोहोच मिळाली. डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनच्या वतीने आपत्तीग्रस्त कुटुंबांना संसारोपयोगी वस्तू वाटप आणि १५ दिवस पुरेल एवढे धान्य देण्यात आले. त्यामुळे या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
काल पंचगंगा साखर कारखान्यावर समोरील ऊसतोड मजुरांच्या २ झोपड्या जळाल्या यामध्ये ३ गुरे मृत्युमुखी पडले तर झोपडीतील संसारोपयोगी साहित्य, धान्य जळून खाक झाले. हे वृत्त समजताच डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शैला कांबरे, सचिव रघुवीर सिंह राठोड, सदस्या डॉ. ज्योती बडे, डॉ. दशावतार बडे, मनोहर कांबरे यांनी घटनास्थळाला भेट देवून माहिती घेतली. लक्ष्मण बहिरवाळ, गणेश बहिरवाळ या मजुरांच्या झोपड्या जळाल्याची माहिती मुकादम लहु दहे यांनी दिली.
त्यानंतर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनानुसार अध्यक्ष अनिल नानिवडेकर यांच्या सहकार्याने मुळे फाऊंडेशनचे पदाधिकारी तसेच सदस्य संजय सुतार त्यांचे मित्र नकाते सर डीकेटीई नारायण मळाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील या सर्वांच्या उपस्थितीत या कुटुंबांना कपडे, भांडी, १५ दिवस पुरेल इतके धान्य वाटप केले. मुळे फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच आपत्तीग्रस्त लोकांना मदत पोहचवली जाते. याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून मुळे फाऊंडेशनचे कौतुक होत आहे.
‘तरुण भारत’ मुळे कुटुंबांना तात्काळ मदत झोपड्या जळाल्याची व त्यामध्ये दोन कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य जळाल्याची माहिती तरुण भारत सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाली होती. ही बातमी आम्ही वाचताच तात्काळ घटनास्थळी गेल्याची माहिती फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शैला कांबरे यांनी दिली. त्यामुळे त्या कुटुंबांना फाउंडेशनच्या वतीने तात्काळ मदत देतात आली. |