भर उन्हात पदयात्रा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर द्वारसभा, निदर्शने
प्रतिनिधी / कोल्हापूर
इंधन दरवाढ कमी करावी, अन्यायकारक कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर द्वारसभा घेतली, निदर्शने केली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना देण्यात आला.
शेतकरी कामगार पक्षाच्या टेंबे रोड येथील कार्यालयापासून दुपारी एकच्या सुमारास इंधन दरवाढी विरोधी मोर्चाला सुरूवात झाली. बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नरमार्गे कोंडाओळ, व्हिनस कॉर्नरमार्गे मोर्चा दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. शेकापच्यावतीने मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.
निवेदनात केंदाने तीन कृषी कायदे घाईघाईत मंजूर केले. या कायद्यांना शेतकऱयांचा विरोध आहे हमीभाव नसल्याने शेतकऱयांना भांडवलदारांच्या हवाली केले आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या कायद्यांना विरोध आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास शेतकरी कामगार पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. तसेच कृषी कायदे रद्द करावेत, कामगार विरोधी कायदे रद्द करा, लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करा, इंधन दरवाढ रद्द करा, एफआरपीप्रमाणे शेतकऱयांना 14 दिवस एकरकमी बिले द्या, अशा मागण्या केल्या आहेत.
शेकापचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिलीपकुमार जाधव, प्राचार्य टी. एस. पाटील, बाबासो देवकर, एकनाथ पाटील, शिवाजी साळुंखे, ऍड. उज्वला कदम, संतराम पाटील, केरबाभाऊ पाटील, बाबुराव कदम, भारत पाटील, संभाजी जगदाळे, अशोकराव पवार पाटील, अमीत कांबळे, लता कांदळकर, अजित सुर्यवंशी, अजीत देसाई, संग्राम पाटील आदी सहभागी झाले होते.