प्रतिनिधी / इचलकरंजी
लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल माफ करून वीजदराच्या वाढीव निर्णयाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी येथील गांधी चौकात नवीन युवक सेनेच्या वतीने ढोल बजाओ, बील जलाओ हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ढोल वाजवून बिलाची होळी केली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इचलकरंजी शहरातील जनता आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून ३ महिन्यांचे वीज बील माफ करावे. तसेच याबाबत गांभीर्याने दखल घेण्याऐवजी शासनाने वीजदर वाढीचा निर्णय घेवून नागरिकांच्या माथ्यावर आणखी भुर्दंड वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. वीज ग्राहकांची महाराष्ट्रात मोठी असून स्थिर आकार वाढल्याने जनतेला ६६.८१ कोटींचा प्रती महिना भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे, वाढीव वीजबिलाचा निर्णय स्थगित ठेवावा, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संतोष कांदेकर, योगेश चव्हाण, दत्ता मांजरे, बाळासाहेब खाडे, महादेव घटे, अतुल नवनाळे, नंदू शिंदे, चंद्रकांत खोंद्रे, युवराज माने, रेश्मा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.