वार्ताहर/पाटगांव
भुदरगड तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागात ऊस पिकावर लोकरी मावा आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतीमधील ऊस पीक बऱ्याच ठिकाणी धोकादायक स्थितीत दिसत आहे. तर भात पिकावर करपा रोग पडला आहे. यामुळे लोकरी मावा आणि तांबेरा कसा आटोक्यात आणायचा या प्रश्नाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शेतीपीक म्हणून भात आणि ऊसाची ओळख आहे. ऊस शेतीवर शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबुन आहे. कमी खर्चाची, कमी कष्टाची शेती म्हणजे ऊसशेती अशीही ओळख मध्यंतरी बनली. मात्र, पिकावर पडणार्या दरवर्षी वेगळ्या रोगामुळे उत्पादनात सातत्याने घट होत आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे
तालुक्यात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाला आहे. उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग हा बुरशीमुळे होत असतो. उसाच्या पानावर सुरुवातीला तांबडे ठिपके पडतात. नंतर ठिपक्यांचा आकार वाढत जातो. उसाच्या पानांचा भुगा झालेला आढळतो. ऊसाची पाने तांबडी पडून पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी पानेच खराब झाल्याने ऊस रोपांतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया खंडित होण्याच्या मार्गावर असते. याचा फटका म्हणून ऊसाची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते.
त्याचप्रमाणे लोकरी माव्याची कीड आली असून, तिचा प्रसार झपाटय़ाने वाढतो आहे. लोकरी माव्याने उसाची पाने पांढरी तर, वाडे काळे पडले आहेत. ही कीड उसातील हरितरस शोषून घेत असल्याने उसाची वाढ खुंटत आहे. उसाला लोकरी माव्याने विळखा घातला असल्याने मोठय़ा आर्थिक हानीची भीती व्यक्त होत आहे
नदी काठावरील तसेच डोंगराशेजारील शेतीमध्ये ऊसाचे प्रमाण अधिक आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, नवीन संकरित जाती, उसाच्या सरीतील अंतर कमी, युरियाचा अधिक वापर यामुळे तांबेरा रोग पडला आहे. तांबेरा कमी होण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणजे पावसाची उघडीप हाच आहे. तर कृत्रिम उपाय म्हणून औषध फवारणी आवश्यक आहे. डायथेन, क्लीक्झिनच्या फवारण्या केल्या तर तांबेरा काही प्रमाणात नियंत्रणात आणता येतो. मात्र, सध्या तशीही स्थिती नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.