संजीव खाडे / कोल्हापूर
कोल्हापूर शहरासह जिल्हय़ात ज्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसेदिवस चिंताजनक बनत चालली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘आरोग्य रक्षक आपल्या दारी’ ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात कसबा बावडय़ातील प्रभागांतून करण्यात येणार आहे. प्रभागातील प्रत्येक घरातील सर्व व्यक्तींच्या आरोग्याची माहिती दररोज सकाळ, संध्याकाळी घेण्यात येईल. कुणी आजारी असेल तर त्याला रूग्णालयात नेण्यासाठी मदत केली जाईल. यासाठी कार्यकर्ते आणि स्थानिक नगरसेवकाची मदत घेतली जाणार आहे. नजिकच्या काळात शहरातील सर्व प्रभागात हा उपक्रम राबविण्याची पालकमंत्री सतेज पाटील यांचे नियोजन आहे.
कोरोना संसर्ग ज्या पद्धतीने शहर आणि जिल्हय़ात वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. उपाययोजना करूनही जूनमध्ये सेफ असणाऱया कोल्हापूर शहर आणि जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातून सद्यःस्थितीची गंभीरता स्पष्ट होत आहे. नागरिकांना आवाहन करण्याबरोबर युद्ध पातळीवर उपाययोजना करूनही रूग्ण संख्या आणि मृत्यु होणाऱयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हॉट स्पॉटवर लक्ष केंद्रीत करण्याबरोबर कॉन्टॅक्ट टेसिंग वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या आहेत. या उपाययोजनांच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष तळागाळात असणार्या स्थितीचा सामना करण्यासाठी माहिती संकलन आणि जागृती करण्यावर भर देण्याचा निर्णय पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला आहे.
असा आहे उपक्रम : प्रत्येक घरी दररोज चौकशी
या उपक्रमाविषयी माहिती देताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले, कोरोनाचा संसर्ग वाढत असताना तळागाळातील स्थितीचे आकलन करून यापुढे आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. आता प्रत्यक्षात प्रत्येक घरापर्यंत जाऊन जागरूकता करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एक वेगळा उपक्रम प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आरोग्य रक्षक आपल्या दारी…’ या उपक्रमानुसार प्रभागातील नगरसेवक आणि त्याच्या मदतीचा कार्यकर्त्यांचा चमू दिला जाईल.हा चमूच आरोग्य रक्षक म्हणून कार्यरत राहिल. त्यांच्या पथकाला गल्ली आणि घरे विभागून दिली जातील. ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक घराच्या दारात जातील, घरातील प्रत्येक व्यक्तीबाबत चौकशी करतील. घरात किती व्यक्ती आहेत? कुणी आजारी आहे काय? कुणाला कोणताही त्रास होत नाही ना?, कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत ना?, इतर काही आरोग्याच्या समस्या आहेत काय? याविषयी माहिती घेतील. ही चौकशी केल्यानंतर प्रत्येक घराचा डाटा संकलित केला जाईल. त्यातून ज्या घरातील सदस्याला आरोग्यविषयक तक्रारी अथवा कोरोनाविषयक लक्षणे आढळतील. त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मदत केली जाईल.
पहिल्या टप्प्यात कसबा बावडा नंतर शहरात उपक्रम
पहिल्या टप्प्यात कसबा बावडय़ातील पाच प्रभागात हा उपक्रम राबविण्यात येईल. त्यानंतर त्याच्या यशस्वीतेनंतर शहरात हा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. प्रमुख कार्यकर्त्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे. लवकरच या उपक्रमाचे नियोजन करून अंमलबजावणी केली जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
भिती आणि इतर कारणांनी आजार लपविण्याचे प्रकार
कोरोनाची लक्षणे दिसू लागली तरी स्वॅब देणे, उपचार घेणे काही जण टाळतात. आजार अंगावर काढतात. काही जण काय होते? अशा भ्रमात राहतात. काही जण भीतीपोटी होणारा त्रास सांगणे टाळतात. काही जणांना आर्थिक विवंचनाही असते. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रत्येक घरात चौकशी करण्याचा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावे. स्वतःची, स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
नागरिकांच्या आरोग्याची घरोघरी जाऊन दररोज चौकशी करण्याचा उपक्रम कसबा बावडय़ात प्रथम राबविला जाईल. नंतर तो शहरातील सर्व प्रभागात राबविण्याचे नियोजन आहे. त्यातून कोरोनाच्या संसर्ग कमी करण्यास मदत होईल. -सतेज पाटील, पालकमंत्री