भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांचे मंत्री पीयुष गोयल यांना साकडे
प्रतिनिधी / कोल्हापूर
साखर उद्योगाच्या हिताच्या दृष्टीने एफआरपीच्या तुलनेत साखरेची एम. एस. पी. वाढणे गरजेचे आहे. तेव्हा साखरेच्या एम. एस. पी. दरामध्ये लवकरात लवकर वाढ व्हावी. तसेच कोल्हापूर-कागल-बेळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गाला लागून नवीन रेल्वे ट्रॅक निर्माण व्हावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निवेदनातून केली. घाटगे यांनी गोयल यांची नुकतीच नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी या प्रस्तावांवर विचार करून लवकरात लवकर निर्णय करु, अशी ग्वाही गोयल यांनी दिली.
2020-21 या हंगामासाठी सरकारने उसाचा एफआरपी 275 वरून 285 रुपये केला. त्यामुळे साखरेची उत्पादन किंमत वाढली. परंतु 2018 मध्ये साखरेची कमीत कमी विक्री किंमत 29 रुपये प्रति किलो ठरवली. 2019 मध्ये त्यात बदल करून 31 रुपये प्रति किलो केली. परंतु 2020-21 मध्ये त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे नमूद करून शक्य तेवढ्या लवकर एमएसपी मध्ये बदल करण्यात यावा, अशी विनंती घाटगे यांनी निवेदनात केली आहे.
कोल्हापूर शहरापासून जाणार्या पुणे-बेंगलोर या महामार्गा जवळून जर मिरज कोल्हापूर या रेल्वे ट्रॅकला जोडणारा कोल्हापूर-कागल-बेळगाव असा नवीन रेल्वे ट्रॅक तयार केला, तर यामुळे कोल्हापूरचे कोकण आणि कर्नाटकशी असलेले संबंध दृढ होतील. त्याचप्रमाणे व्यापार, उद्योग क्षेत्रास चालना मिळेल. शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही गती निर्माण होईल. त्यामुळे कोल्हापूर-कागल-बेळगाव या ट्रॅकची निर्मिती व्हावी, अशी विनंतीही यावेळी त्यांना निवेदनाद्वारे केली आहे.