प्रतिनिधी/कोल्हापूर
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत ८ ते १५ ऑगस्ट २०२० या कालावधीत “गंदगी मुक्त भारत “ हे वर्तन बदल अभियान राबविले जात आहे. या “गंदगी मुक्त भारत“ अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
या अभियान कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर सिंगल युज प्लास्टिक संकलन मोहीम राबविणे, गावामध्ये स्वच्छता श्रमदानातून सार्वजनिक ठिकाणे, इमारती यांची स्वच्छता करणे, तसेच ‘ओ डी एफ प्लस’ मोबाइल अप्लिकेशनची माहिती देऊन जनजागृती करणे, स्वच्छता संदेश व भित्तिचित्रे रेखाटने, गावस्तरावर वृक्षलागवडीसाठी श्रमदान करणे, विध्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची – ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित करणे (इयत्ता ६ वी ते ८ वी ) निबंध स्पर्धा (इयत्ता ९ वी ते १२ वी ) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वछता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे, ग्रामसभेमध्ये गाव ‘ओ डी एफ प्लस’ घोषित करणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत.
अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले जाणार असून कोविड -१९ च्या प्रादुर्भावाचा विचार करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन सीईओ अमन मित्तल यांनी केले आहे.