प्रतिनिधी / असळज
कोल्हापूर गगनबावडा हा गोवा, कोकण यांना जोडणारा अत्यंत जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूकही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र काही ठिकाणी असणाऱ्या अरुंद साईट पट्यामुळे अपघात वाढत आहेत. ऊस गाळप हंगाम लवकरच सुरु होण्याची शक्यता असल्याने ट्रक-ट्रॅक्टर यांची मोठी वाहतूक होत असते.
डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, राजाराम साखर कारखाना,दालमिया आसुर्ले-पोर्ले, कुंभी साखर कारखाना या साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक या मार्गावरून केली जाते. त्यामुळे या मार्गावरील साईट पट्या व्यवस्थित असणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्याच्या कडेला साईट पट्या रस्त्यापासून खोल असल्याने वाहन पळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोकुर्ले नरसोबा मंदिर, अणदूर असळज याशिवाय बऱ्याच ठिकाणी रस्ता व साईट रस्ता यामध्ये चढ-उतार याची तफावत आहे. त्यामुळे भरलेली वाहने सहज पलटी होवू शकतात. अरुंद साईट पट्यामुळे असळज कारखान्याजवळ एका ट्रकचा अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे या मार्गावरील साईट पाट्या रुंद कराव्यात अशी मागणी वहान धारकातून होत आहे.