-सत्ताधाऱयांना पाठिंबा की परिवर्तन आघाडीला बळ याबाबत मतभिन्नता
-`आमचं ठरलयं’पॅटर्नला काही नेत्यांचा विरोध
कृष्णात चौगले/कोल्हापूर
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी नुकतीच अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून 16 किंवा 17 मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर हाईल. त्यामुळे एक एक मत मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही मायक्रोप्लॅनिंग सुरु केले आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते ठरावधारकांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत. `आमचं ठरलयं, आता गोकुळ उरलयं’ या पॅटर्नखाली पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात भक्कम आघाडी तयार करण्याची रणनिती आखली आहे. तर `गोकुळ’च्या अर्थिक सत्ताकेंद्रावर पुन्हा आपलेच वर्चस्व राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही ताकद पणाला लावली आहे. यामध्ये गतनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत असणाऱ्या राष्ट्रवादीची मात्र कोंडी झाली आहे. एकसंघ ताकद दुभंगण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील (शिरोळ), गणपतराव पाटील (शिरोळ), माजी आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, करणसिंह गायकवाड, आमदार राजूबाबा आवळे, कागलचे प्रवीणसिंह पाटील, राजेखान जमादार, चंदगडचे बाळासाहेब कुपेकर, गोकुळचे माजी संचालक चंद्रकांत बोंद्रे यांचे चिरंजीव मानसिंग बोंद्रे, करणसिंह पाटील, किशोर पाटील, गडहिंग्लजच्या अंजना रेडेकर आदी नेतेमंडळींची मोट बांधली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील याच आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आगामी काळात आणखी काही नेत्यांची भर पडणार आहे.
ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांची गोची
गोकुळच्या साठमारीत सत्ताधाऱयांसोबत जायचे की परिवर्तन आघाडीला पाठिंबा द्यायचा याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची गोची झाली आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करुन भूमिका गुलदस्त्यात ठेवली. त्यांच्या निर्णयावरच जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा निर्णय अवलंबून आहे. तर माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे विद्यमान संचालक तथा चंदगडचे आमदार राजेश पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, मानसिंगराव गायकवाड आदी नेत्यांचा सत्ताधारी आघाडीकडे कल आहे. स्थानिक राजकीय संदर्भ, पक्षसंघटना, गट टीकवण्यासाठी सत्ताधाऱयांना आपली ताकद देण्याबाबत त्यांनी जवळपास निश्चित केले आहे. त्याबाबत राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाकडेही त्यांनी आपली भूमिका मांडल्याचे समजते. परिणामी मंत्री मुश्रीफ यांनी जरी परिवर्तन आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तरी गतनिवडणुकीप्रमाणे त्यांच्यासोबत एकसंघ राष्ट्रवादी असेल असे ठामपणे म्हणता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद दुभंगण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी गटाचे नेतृत्व पी. एन. पाटील यांच्याकडे
विद्यमान संचालकांनी सर्वानुमते सत्ताधारी गटाचे नेतृत्व पी. एन. पाटील यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी महाडिक गट सक्रिय दिसत नसला तरी त्यांच्याकडून तळागाळात जाऊन मतांची गोळाबेरीज सुरु आहे. यामध्ये दोन विद्यमान संचालक वगळता इतर सर्व संचालक सत्ताधारी आघाडीसोबतच आहेत. त्यांना आता आमदार विनय कोरे व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आमदार प्रकाश आवाडे, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांची साथ मिळण्याची शक्यता आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नसल्यामुळे पी. एन. पाटील यांनी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद मिळवण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांना साकडे घातले आहे. त्यामुळे मुश्रीफ कोणता निर्णय घेणार? यावरती कोणाचे पारडे जड होणार हे निश्चित होणार आहे.
दोन विद्यमान संचालक परिवर्तन आघाडीत ?
गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डेंगळे, संचालिका जयश्री पाटील-चुयेकर हे परिवर्तन आघाडीतून सक्रिय झाल्याची चर्चा आहे. तर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे सत्ताधाऱयांमध्ये अस्वस्थता आहे. या तीन्ही संचालकांकडे मतांचा मोठा गठ्ठा आहे. पण डोंगळे आणि चुयेकर घराण्यातील दुसरा उमेदवार देऊन सत्ताधाऱयांकडून `फोडा आणि राज्य करा’ ही निती अवलंबली जाण्याची शक्यता आहे.