महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित : `स्वच्छ भारत’मधील कंत्राटदारांकडून काम सुरू : आरडीएफ आणि खतही करणार तयार
प्रतिनिधी / कोल्हापूर
कसबा बावडा लाईन बाजार येथील झूम प्रकल्पावरील गेली दोन महिने बंद पडलेला कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प मंगळवारी सुरू करण्यात आला. महापालिकेने स्वतः हा प्रकल्प ताब्यात घेऊन स्वच्छ भारत योजनेतील कंत्राटदारांच्या मदतीने काम सुरू केले. वीज निर्मितीबरोबर आरडीएफ (रिफ्युझ्ड डिरिव्ह फ्युल) आणि खत निर्मितीचे कामही सुरू करण्यात आल्याची माहिती महापलिकेच्या वतीने देण्यात आली.
कोल्हापूर शहरासह उपनगरातील दररोज तयार होणारा कचरा कसबा बावडा लाईन बाजार येथील झूम प्रकल्पावर (घनकचरा प्रकल्प) डंप केला जातो. यापूर्वी या ठिकाणी झूम कंपनीच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असे. झूम कंपनी गेल्यानंतर इतर कंपन्यांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू करण्यात आले. कचऱ्यापासून खत निर्मिती, कचऱयापासून वीज निर्मिती आदी प्रकल्प सुरू करण्यात आले. ओला, सुका कचरा वेगळा करण्याबरोबरच इनर्ट मटेरियलही वेगळे काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रिया केलेल्या कचऱ्यावर कॅपिंगही करण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपूर्वी कोल्हापूर ग्रीन एजन्सी या प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीने अचानकपणे काम थांबविले. त्यामुळे वीज निर्मिती प्रकल्प बंद पडला. त्याचा परिणाम खत निर्मिती व इतर कामांवरही झाला. कंपनीने कोणतीही कल्पना न देता गाशा गुंडाल्यानंतर याबाबत महापालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली. 10 फेब्रुवारीच्या अंकात `तरुण भारत’ने `झूम’वरील वीज निर्मिती प्रकल्प बंद’ या शीर्षकाखाली बातमी देऊन महापालिकेत सुरू असलेला कारभार पुढे आणला होता. आता त्यानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तातडीने ऍक्शन घेत महापालिकेच्या वतीने प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर संबंधित कंपनीलाही नोटिस बजावण्यात आली.
मंगळवारी काम सुरू
मंगळवारी संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेत महापलिकेने वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला. आता या ठिकाणी वीज निमितीबरोबर कचऱ्यापासून खत आणि कचऱ्यापासून आयडीएफ तयार करण्यात येणार आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे.
साचलेल्या, मिसळलेल्या कचऱ्यापासून आरडीएफ
गेले दोन अडीच महिने वीज निर्मिती प्रकल्प बंद पडल्याने शहरातून उठाव करून झूमवर डंप करण्यात आलेला ओला आणि सुका कचरा एकत्रित मिसळला गेला. तो सुमारे दोनहजार ते अडीच हजार टन असण्याची शक्यता आहे. अशा कचऱ्यापासून वीज निर्मिती करता येत नाही. त्यामुळे त्या पासून आरडीएफ अर्थात (रिफ्युझ्ड डिरिव्ह फ्युल) तयार करण्यात येणार आहे. आरडीएफचा वापर सिमेंट उद्योगात ज्वलनशिल पदार्थ म्हणून केला जातो. त्यासाठी तयार होणारे आरडीएफ पुरवले जाणार आहे.
असा आहे कचऱयापासून वीज निर्मिती प्रकल्प
कचऱ्यापासून वीज निर्मितीची प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पातून दररोज 180 ते 200 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते. झूम प्रकल्पावरील विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेला दररोज 440 किलो वॅट वीज लागते. कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पातून महापालिकेला 240 किलो वॅट वीज मिळत होती. त्यामुळे उर्वरीत 200 किलो वॅट वीज महापालिकेला महावितरणकडून विकत घ्यावी लागत होती. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एका टनामागे महापालिका कोल्हापूर ग्रीन एजन्सीला 308 रूपये देत होती.
रविवार देखभालीचे काम कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱया प्रकल्पाबरोबर खत आणि आरडीएफ निर्मिती प्रकल्पाच्या सर्व यंत्रणेची देखभाल ही रविवारी करण्यात येणार आहे. महापालिकेने स्वतः यंत्रणा राबवत हा प्रकल्प सुरू केला असली तरी त्यासाठी स्वच्छ भारत योजनेतील कंत्राटदारांचीही तांत्रिक मदत घेण्यात आली आहे. |