शेतकऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील घटकांना नाहक त्रास
उचगाव / वार्ताहर
गांधीनगर मेनरोडसह बाजारपेठेत होणाऱ्या मोठ्या गर्दीला अटकाव करण्यासाठी तसेच विनाकारण फिरणार्यांवर कारवाई साठी तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ मंगळवारी डीवायएसपी आर. आर .पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली.
गांधीनगर बाजारपेठेत होणारी गर्दी डोकेदुखी ठरत असल्याने डीवायएसपी आर आर पाटील तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ आले. त्यांनी जे लोक विनाकारण फिरत असतील अशांवर कारवाई करण्याच्या सूचना गांधीनगर पोलिसांना दिल्या. विनाकारण फिरणाऱ्या लोकांना अडवण्यात आले. त्यातच खते व बी-बियाणे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनाही रोखण्यात आले. त्यांना विनाकारण थांबवून ठेवण्यात आले. अखेर कंटाळून काहीजण उचगाव मार्गे निघून गेले.
दरम्यान गांधीनगर शासकीय उपजिल्हा वसाहत रुग्णालयांमध्ये लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही तावडे हॉटेलनजीक उड्डाणपुलाजवळ अडवण्यात आले. शासकीय वसाहत रुग्णालयमध्ये लस घेण्यासाठी गांधीनगर परिसरासह जिल्ह्यातून नागरिक येत असतात. पण त्यांना अडवून ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील काही घटकानाही असाच कटू अनुभव गांधिनगर पोलिसांकडून आला. नागरिक संतप्त झाले.
विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे; पण शेतकऱ्यांवर, लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना का अडवण्यात आले, असा संतप्त सवाल घटनास्थळी उपस्थित झाला. दरम्यान झालेल्या या शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, सामाजिक कार्यकर्ते जितू कुबडे यांनी तात्काळ डी वाय एस पी आर आर पाटील यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना, लस घेण्यासाठी आलेल्या व अत्यावश्यक सेवेतील घटकांना झालेल्या नाहक त्रासाचा त्यांनी आर आर पाटील यांना पाढाच वाचून दाखवला.
नागरिकांना झालेल्या या नाहक त्रासाबद्दल आर आर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,गांधीनगरमध्ये होणाऱ्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी नाकाबंदी करण्यात आली. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील घटकांना कारवाईदरम्यान थोडा वेळ थांबावे लागले. पण चौकशीअंती त्यांना सोडण्यात आले.