प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या वर्षी महापुरामुळे शहराच्या पूरक्षेत्रातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना पाणीबिलात वर्ष लोटले तरी सवलत देण्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला मात्र व्यापाऱयांना न मागताही पाणीबिलात सवलत देण्याचा प्रस्ताव कोणाच्या सांगण्यावरून आणला. पूरग्रस्तांच्या ऐवजी व्यापाऱयांचा पुळका का? अशा शब्दात सदस्यांनी सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱयांना धारेवर धरले.
राजर्षी शाहू सभागृहात महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सर्वसाधारण सभा झाली. नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे प्रशासनाच्या वतीने उपस्थित होत्या. या सभेत लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱयांची नळ कनेक्शनधारकाची बिले घरगुती दराने आकारण्यात यावी, हा स्थायी समितीच्या शिफारशीचा ठराव शहर पाणी पुरवठा विभागाने आणला होता. त्यावरून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. प्रा. जयंत पाटील यांनी व्यापाऱयांकडून घरगुती दराने पाणीबिल आकारणी कशी करणार? ते स्पष्ट करा, जी दुकाने शंभर टक्के बंद होती, त्यांना सवलत द्या पण जी दुकाने सुरू होती. त्यांना सवलत देवू नका, असे सांगितले. या सवलतीतून दवाखान्यांचा वगळा, असे शारंगधर देशमुख यांनी सांगितले. व्यापाऱयांचा विषय सुरू असताना राजसिंह शेळके यांनी आक्रमक पवित्रा घेत जलअभियंता भास्कर कुंभार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. शेळके म्हणाले, 2019 च्या महापुरात शहरातील पूरभागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. ही संख्या साडेबाराहजारहून अधिक आहे. कुणाच्या घरात पाणी घुसले होते, हे महापालिकेच्या मीटर रिडर्सना माहित आहे. पण त्यांच्यापैकी किती नुकसानग्रस्तांना पाणी बिलात किती सवलत मिळाली? हे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट करावे. मागणी न करता व्यापाऱयांना सवलत देता, त्यांचा पुळका का?, असा संतप्त सवाल शेळके यांनी उपस्थित केला. त्यावर जलअभियंता कुंभार यांनी उत्तर पंचनामे सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. अजित ठाणेकर, कमलाकर भोपळे यांनी पंचनाम्याच्या याद्या कधी येणार, त्याची तारीख निश्चित करा, अशी मागणी केली. सर्वसाधारण सभेने ठराव करून सवलत देण्यास सांगितले तरी प्रशासन सर्वसामान्यांसाठी काम करत नाही, व्यापाऱयांसाठी काम करते, असा आरोप राजसिंह शेळके यांनी करत पूरग्रस्तांना पाणीबिलात तातडीने सवलत देण्याची मागणी केली. रूपाराणी निकम यांनी राजेंद्र नगर झोपडपट्टीतील अतिवृष्टीने घरे पडलेल्यांना सवलत देण्याची मागणी केली. शारंगधर देशमुख यांनी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असलेल्यांना सवलत द्या, अशी सूचना केली. अखेर हा ठराव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला.
केएमसी कॉलेजच्या दर्जावर सभेत चिंता व्यक्त
यशवंतराव चव्हाण कॉलेज अर्थात केएमसी कॉलेज दर्जावर महापालिकेच्या या सभेत चिंता व्यक्त करण्यात आली. केएमसी कॉलेजमध्ये विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालय विकास समिती गठित करण्यासंदर्भातील ऑफीस प्रसताव केएमसी कॉलेजकडून सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यावर झालेल्या चर्चेत सदस्यांनी कॉलेजच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले. प्रा. जयंत पाटील म्हणाले, महापालिकेच्या पैशावर केएमसी कॉलेज चालते. इतर कॉलेज 20 लाख ते एक कोटी पर्यंत अनुदान मिळवत असताना केएमसी कॉलेजने आजवर कोणतेही अनुदान मिळवलेले नाही. नॅकच्या मानांकनात सी ग्रेड मिळाली आहे. सी ग्रेडचा अर्थ कॉलेज चालविण्यास लायक नाही, दर्जा नाही, असा होता. शेखर कुसाळे म्हणाले, सर्व सवलती दिल्या तरी दर्जा सुधारण्याची कॉलेजकडे इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे ग्रेड खालावली आहे. किरण नकाते यांनी कॉम्प्युटर लॅब नव्हती ती उभारली. कॉलेज प्रशासनाने दर्जा सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आयुक्तांनी कॉलेजची पाहणी करावी. अखेर उपसूचनेसह कॉलेजसंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला.
निविदा न काढता रिक्षा भाडेतत्वावर घेतल्या कशा?; जयश्री चव्हाण यांचा सवाल
कोरोनाच्या जनजागृतीसाठी महापालिकेने ज्या रिक्षा भाडेतत्वावर घेतल्या होत्या. त्याच्या निविदा का काढण्यात आल्या नाहीत?, परस्पर कोटेशनव्दारे रिक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये महापालिकेचे काही अधिकारी आणि काही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांच्यात संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी केला. काही विशिष्ट रिक्षा संघटनांच्या मर्जीतील रिक्षा चालकांच्या रिक्षा भाडेतत्वावर घेण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नगरसेविका चव्हाण यांनी केली.
पंचगंगा, सावित्रीबाई फुले दवाखाने सांभाळा
डॉक्टरसह स्टाफ नियुक्ती, औषध पुरवठÎाची सदस्यांनी केली मागणी
सर्वसामान्य नागरिकांसाठी आधारवड असणाऱया पंचगंगा, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये डॉक्टरसह इतर स्टाफ पुरेसा नाही, औषध पुरवठाही ठप्प आहे. त्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. अनेक रूग्णांना बाहेर जावून उपचार घ्यावे लागत आहेत. बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. प्रसंगी डेसिंगही रूग्णांच्या नातेवाईकांना करावे लागत आहे, अशा शब्दात पूजा नाईकनवरे, शोभा कवाळे, उमा इंगळे, रूपाराणी निकम या महिला सदस्यांनी आपल्या भावना मांडल्या. सदस्य नियाज खान यांनी कोरोनाच्या काळात खासगी रूग्णांना महापलिकेने दिलेले व्हेटिंलेटर अद्याप परत मिळालेले नाहीत. त्यामध्ये काही रूग्णांना लाभ मिळाला आहे. मात्र खासगी डॉक्टरांनी लाखो रूपये मिळवले आहे, असा आरोप केला.
महिला सदस्यांनी आक्रमकपणे अपुऱया आरोग्य सुविधांवरून प्रशासनाला धारेवर धरले. पूजा नाईकनवरे यांनी चित्रफित सादर करत पंचगंगा, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील रूग्णांच्या व्यथा मांडल्या. पुरेसे डॉक्टर नसल्याने रूग्णांना इतर दवाखान्यात जाण्यास सांगितले जाते. डेसिंग रूग्णांच्या नातेवाईकांना करावे लागते, असे सांगितले. उमा इंगळे म्हणाल्या, सिझेरियनसाठी 1300 ऐवजी 6000 रूपये कसे आकारले जातात?, उमा बनसोडे यांनी कोरोनाच्या काळात आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये गरम पाणी मिळत नव्हते, या गोष्टीकडे लक्ष वेधले. कोरोनाच्या काळात सुविधा न मिळाल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे सांगितले.
व्हेंटिंलेटरमध्ये भ्रष्टाचार ः नियाज खान
महापालिकेने कोरोनाच्या काळात खासगी रूग्णालयांना व्हेटिंलेटर दिले होते. ते वापरताना दवाखान्यांनी काही रूग्णांना योजनेत बसवून त्याचा वापर इतर रूग्णांवर करून लाखो रूपये मिळवले. या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी सदस्य नियाज खान यांनी केली. शारंगधर देशमुख यांनी व्हेटिंलेटरचा दर्जा खराब असून तो तपासावा, दुरूस्त करून घ्यावेत, असे सांगितले.
उघडी पाण्याची टाकी अन् घाण पाणी !
ई वॉर्डाला पाणी पुरवठा करणाऱया कावळा नाका येथील धोकादायक बनलेल्या पाण्याच्या उघडÎा टाकीचा प्रश्न या सभेत गाजला. शोभा कवाळे, उमा बनछोडे, रूपाराणी निकम, उमा इंगळे यांनी शहरात घाण, अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असे सांगितले. सदस्य रत्नेश शिरोळकर यांनी तर सभागृहात चित्रफित सादर करून कावळा नाका पाण्याच्या टाकीची स्थिती दाखवली. टाकी उघडी आहे. त्यामुळे त्यांना प्राणी, पक्षी पडतात. तेथे काम करणाऱया कामगारांनाही धोका आहे. जीवन प्राधिकरण आणि महापलिकेत समन्वय नसल्याने काम संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. दोन वर्षांपासून ही स्थिती दाखवूनही प्रशासन हालचाल करत नाही, असा आरोप शिरोळकर यांनी केला. शारंगधर देशमुख यांनी अमृत योजनेत काम सुरू असताना नवीन पाण्याच्या टाक्या आधी बांधल्या आहेत. मेन लाईन, गल्लीतील लाईन टाकल्यानंतर टाकी बांधणे आवश्यक होते. पण उलटे काम सुरू आहे. शहर उकरून ठेवले आहे. त्याचा फटका बसत आहे, असे सांगितले