सिटीझन्स कौन्सिलची रेल्वे मंत्रालयाकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकाला जोडणारी कोल्हापूर-बेंगळूर चन्नम्मा एक्स्प्रेस लॉकडाऊनपासून बंद आहे. बेळगाव विभागातून जाणारी ही महत्त्वाची रेल्वे असून, ती बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. ही रेल्वे सुरू केल्यास मिरज, रायबाग, कुडची, गोकाक, घटप्रभा येथील प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे चन्नम्मा एक्स्प्रेस लवकर सुरू करावी अशी मागणी सिटीझन्स कौन्सिलने रविवारी रेल्वे मंत्रालयाकडे केली.
कौन्सिलच्या पदाधिकाऱयांनी बेळगाव रेल्वे स्टेशनचे चिफ ऑफ कमर्शियल ट्राफिक मॅनेजर अनिलकुमार यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. रेल्वे मंत्रालयाला निवेदन पाठवून ही रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. 1940 साली एम. जी. कंपनीची पुणे-बेंगळूर मार्गावर रेल्वे धावत होती. याचेच परिवर्तन मिरज बेंगळूर या रेल्वेमध्ये झाले. 2002 साली ही रेल्वे कोल्हापूर येथून सुरू करण्यात आली. सध्या बेळगाव-मिरज मार्गावर सकाळची रेल्वे उपलब्ध नसल्यामुळे नोकरदारांचे हाल होत आहेत. त्यामुळे ही रेल्वे सुरू झाल्यास त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
मागील 7 महिन्यांपासून ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. रेल्वे बंद असल्याने कोल्हापूर-बेंगळूर असा प्रवास करणाऱया प्रवाशांना बेळगावपर्यंत पोहोचून रेल्वे प्रवास करावा लागत आहे. राणी चन्नम्मा एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असल्याने ही रेल्वे लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हुबळी-पुणे रेल्वे सुरू करा
रात्री 9 नंतर बेळगावहून पुण्याकडे जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध नाही. त्यामुळे हुबळी-मुंबई या मार्गावर रेल्वे सुरू करावी. सायंकाळी 6.30 वा. हुबळी येथून निघून रात्री 9 वा. ही रेल्वे बेळगावला पोहोचेल तर सकाळी 6 वा. पुण्याला पोहोचेल, अशी रेल्वे सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सिटीझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सेवंतीलाल शाह, अरुण कुलकर्णी उपस्थित होते.