वार्ताहर/पाटगाव
भुदरगड तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीवर प्रशासक लागण्याची शक्यता असून राज्यातील मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करून मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे
राज्यात एप्रिल, मे आणि जून, जुलै, ऑगस्ट मध्ये १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तथापि, आता या ग्रामपंचायतींची मुदत संपली असून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही कमी झालेला नाही. त्यामुळे लगतच्या काळात निवडणुका घेणे शक्य नाहीत. तसेच ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींवर शासनामार्फत प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले होते.
यानुसार, भुदरगड तालुक्यातील आदमापुर आंबवणे एरंडपे खेडगे,कलनाकवाडी ,खानापूर, गंगापूर तांब्याचीवाडी ,दोनवडे ,नवले, नवरसवाडी ,नागणवाडी नांगरगाव ,नांदोली ,नाधवडे, नितवडे, पंडीवरे ,पळशिवणे पाचर्डे, पाटगाव ,पाळ्याचा हुडा, पांगिरे ,फणसवाडी बसरेवाडी, बामणे ,बारवे, पेठ शिवापूर ,बेगवडे, मुरुक्टे बेडीव,भालेकरवाडी , भेंडवडे ,ममदापूर . मिनचे खुर्द मेघोली, मोरेवाडी, म्हसवे, म्हासरंग, लोटेवाडी, वासनोली, शिवडाव, सालपेवाडी ,सोर्नुली ,हेळेवाडी या ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना प्रशासक नेमण्यात आले आहे.