कोरोनाने गावच्या एकात्मतेला गेला तडा
प्रतिनिधी / सेनापती कापशी
कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रावर बंधनं आली. रुढी, परंपरा, चाली- रितीही बंद झाल्या. कागल तालुक्यातील मासा बेलेवाडीत गेल्या अनेक वर्षापासून घरातील सर्व गणेश मूर्ती एकत्रित विसर्जित करण्याची परंपरा आहे. ती यावर्षी प्रथमच खंडीत होवून गावच्या एकात्मतेलाच तडा गेला आहे.
अतिशय धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असणारे गाव म्हणून मासा बेलेवाडीचा उल्लेख होतो. इथल्या रुढी, चालीरिती, परंपरा गावात जपल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे घरातील गणेशाचे एकत्रित विसर्जन होय. विसर्जनादिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रथम गौराईचे एकत्रित विसर्जन केले जाते. त्यानंतर प्रत्येक गल्लीतील गणेश मूर्ती पारंपरिक वाद्याच्या गजरात घेवून भाविक येथील मारुती मंदिरासमोरील चौकात येतात. प्रमुख तीन गल्ल्यांचे गणपती आल्यानंतर वाढीव गावठाण, हरिजन वसाहत येथून गणेश मूर्ती येतात. त्यानंतर एकत्रित गावच्या तळ्यात विसर्जन केले जाते. यामधून गावची एकी दिसून येते. एकटे कोणीही जावून गणेश विसर्जन करीत नाहीत. ही या गावची अनेक वर्षांची परंपरा आहे. कोरोना महामारीत मात्र या गावच्या एकात्मतेला फाटा द्यावा लागला.
येथील नोकरीच्या निमित्ताने बाहेर असणारे लोक हमखास विसर्जनाला येतात. गावात यापूर्वी गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरा होत होता. विसर्जनासाठी सायंकाळी सर्व भाविक तळ्याच्या काठावर जमतात. हे दृश्य वेगळेच असायचे. त्यानंतर चिरमुरे आणि खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो. या प्रसादाची चव कोठेच मिळणार नाही. पण कोरोनामुळे या परंपरा आणि प्रसादाच्या चवीला येथील भाविक मुकले.
दरम्यान आज कागल तालुक्यात घरातील गणरायाला निरोप देण्यात आला. कोणतीही गर्दी न करता विसर्जन झाले. तर काही गावातील सार्वजनिक गणेश मुर्तींचेही विसर्जन झाले.