अनेकांना चालू झाला कंबर दुखीचा आजार… !
कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील नगरपालिकेच्या राजकारणात केवळ सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता याची प्रचिती नागरिकांना वारंवार येऊ लागली आहे शहरातील सर्वच रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून यामुळे शहरातील वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. तर अनेक नागरिकांना या खड्ड्यांमुळे कंबर दुःखी च्या आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत अनेक वाहनधारकानी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. असे असले तरी याबाबत लोक प्रतिनिधी, नगरपालिका प्रशासन राज्यकर्ते मात्र मूग गिळून गप्प का आहेत असा सवाल नागरिकांना पडला आहे.
संस्थानकालीन नगरपालिकेची वाटचाल 138 व्या वर्षाकडे चालू असली तरी येथील नागरी सुविधा बाबत लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र कायम आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरातील रस्त्यांची डागडुजी देखील नगरपालिकेने केलेले नाही याचा परिणाम शहरातील सर्वच रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघातही झाले आहेत. मागील वर्षीच्या महापुरानंतर या रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत शहरातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी विविध आंदोलने केली निवेदने दिली मात्र तात्पुरते खड्डे मुजवून आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली .
याबाबत पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून शहरातील पाणीपुरवठा झाल्यानंतर रस्ते करण्यात येतील अशी उत्तरे दिली जातात. पण येथील पाणी प्रश्न गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कधी होणार? व रस्ते कधी होणार? याबाबत नागरिकांच्या मध्ये संभ्रमावस्था असून नेमके याबाबत काय घडल्यावर पालिकेला जाग येणार? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
एकूणच शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे पालिकेने याबाबत ताबडतोब लक्ष घालून केवळ खड्ड्यांची मलमपट्टी न करता रस्त्याचे काम करावे अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांतून होऊ लागली आहे.