जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील यांचे समरजित घाटगेंवर टिकास्त्र
प्रतिनिधी/कोल्हापूर
एकवीस वर्षापूर्वी काम सुरू झालेल्या आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याकडे शेतकरी, आया-बहिणी डोळे लावून बसले आहेत. उत्तूर व गडहिंग्लजमधील कडगाव विभागातील हजारो एकर जमीन पाण्यासाठी आसुसलेली आहे. समरजित घाटगे, राजकारणाच्या नादात तुमचे अज्ञान प्रकट करू नका, असे टीकास्त्र जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर यांनी सोडले आहे.
पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे, आबेओहळ प्रकल्प दृष्टिक्षेपात आल्यानंतर आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे राजकीय द्वेषापोटी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना श्रेय मिळेल, या भीतीपोटी अकलेचे तारे तोडत आहेत. लाभ क्षेत्रासह प्रकल्पग्रस्त शेतकऱयांच्या अन्नात त्यांनी मीठ कालवू नये. हजारो लोकांचे शाप त्यांनी घेऊ नयेत, अशी त्यांना हात जोडून विनंती आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. माझ्या गिजवणे गावाची जमीन संपादनासाठी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. तसेच; अगदी शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा शब्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
समरजित घाटगे यांनी त्यांचे अज्ञान प्रकट केले आणि आंबेओहळ प्रकल्पाचे सुधारित प्रशासकीय मान्यतेचे 227 कोटी रुपये कुठे गेले ? असा सवाल केला आहे. शासकीय कामे, देण्यात येणारी बिले यांची माहिती नसावी हे आश्चर्य. आपले लोक भोळेभाबडे आहेत. त्यांच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून मी लोकप्रतिनिधी या नात्याने जलसंपदा विभागाकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानुसार सन 1998 मध्ये 29 कोटी 31 लाख निधीसह या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. यामध्ये प्रथम भूसंपादन व पुनर्वसनाची तरतूद म्हणून पाच कोटी 30 लाख रुपये होते व प्रकल्पाच्या कामासाठी 24 कोटी 41 लाखाची तरतूद होती. लाभ क्षेत्रामध्ये चार एकरांवरील क्षेत्राची अट मान्य नव्हती. त्यामुळे पुनर्वसनासाठी जमिनी मिळणे अत्यंत अवघड झाले होते. हसन मुश्रीफ हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी हेक्टरी 36 लाख रुपयांचे पॅकेज जमिनींच्या मोबदल्यापोटी देण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे नियामक मंडळाकडे पाठविला. भाजपच्या पाच वर्षाच्या काळात एक खडाही इकडचा तिकडे झाला नाही. दुसरी प्रशासकीय मान्यता 227 कोटी 54 लाख इतकी मान्य झाली. त्यामध्ये 174 कोटी 30 लाख प्रकल्पावरील खर्च, 98 कोटी 60 लाख पुनर्वसन पॅकेज, जमिनी व 54 कोटी रुपये शिल्लक आहेत. या सर्व माहितीवरून समरजीत घाटगे यांचे ज्ञान किती अगाध आहे हेच दिसून येईल. या प्रकल्पामध्ये व पुनर्वसनामध्ये सहकार्य करता आले नाही तर करू नका. परंतु लोकांच्यामध्ये गैरसमज पसरून त्यांच्या मनातून तरी उतरू नका, एवढीच माफक अपेक्षा आहे.