प्रतिनिधी / कोल्हापूर
संघ स्वयंसेवकांनी राज्यभर काम करावे, नागपूर मुख्यालयात काम करावे असे उपदेशाचे ढोस पाजण्यापेक्षा माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोरोना महामारीच्या काळात काय काम केले? हे एकदा स्पष्ट करावे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकऱयांचे नेतृत्व करण्याचे ढोंग करून आजपर्यंत आपण त्यांना फसवले आहे. आता तर त्यांना वार्यावर सोडून राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शेट्टी यांनी बारामतीचे उंबरे झीजवायला लागले आहेत. या पदासाठी त्यांनी ताळतंत्र सोडले असल्याचा आरोप कोल्हापूर जिह्यातील भाजप पदाधिकाऱयांनी पत्रकाद्वारे बुधवारी केला.
पत्रकात म्हटले आहे, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभर काम करावे अशी उपहासात्मक टिका केली. परंतु देशात ज्या-ज्या वेळी विविध आपत्ती आल्या त्यावेळी रा. स्व संघाचे स्वयंसेवक कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन काम केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथील धारावी परिसरातील संघ स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची माहिती दिली असताना जनतेने नाकारलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना ती माहिती का झोंबली? हे अनुत्तरीतच आहे. जिल्हापरिषद सदस्यापासून ते थेट खासदारकीपर्यंत आपण इतकी वर्षे लोक नियुक्त होता, परंतु राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी आपण आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्याचे नाव बारामतीला सांगाल अशीच सर्वांची अपेक्षा होती. परंतू सर्व कार्यकर्त्यांना बाजूला ठेऊन सत्तेच्या मोहापोटी स्वतःचेच नाव पुढे रेटण्यात आपण धन्यता मानली. त्यामुळे सत्तेतील पदाशिवाय तुम्ही जगू शकत नाही हे सिद्ध होते. ज्या महाविकास आघाडीचे गोडवे गाताना आपण आता थकत नाही, त्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना सांगून सर्वसामान्य नागरिकांची, शेतकऱयांची वीज बिले माफ करावीत. तसेच प्रसिद्धीसाठी वीज बिलांची होळी करून हा प्रश्न सुटणार नाही याची जाणीव ठेवावी.
महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर महाविकास आघाडी सरकारने सरसकट कर्ज माफीची घोषणा केली होती त्याचे काय झाले ? सर्व सामान्य शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासाठी या सरकारने काय केले ? अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांची उत्तरे प्रलंबित असताना व महाराष्ट्रातील सत्ताधीशांनी जनतेला वाऱयावर सोडले असताना फक्त स्वतःच्या आमदारकीसाठी आपण रा.स्व संघावर टिका केली. शेट्टींनी रा.स्व संघाच्या संकेतस्थळावर जाऊन व्यवस्थित माहिती घ्यावी. तसेच खासदार पद गेल्यानंतर आपण समाजासाठी काय केले ? याचीही माहिती तुमच्या संकेतस्थळावर द्यावी असे जाहीर आव्हान भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांनी पत्रकाद्वारे केले आहे.