पाचगाव ग्रामपंचायतची तहसीलदारांकडे तक्रार
वार्ताहर / पाचगाव
पाचगाव ग्रामपंचायत हद्दीत ललित गांधी यांनी बेकायदेशीर प्लॉटिंग केले असून त्यासाठी जमिनीचे उत्खनन केले आहे. उत्खनना मधील हा मुरूम पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळावी अशी मागणी पाचगाव ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे.
पाचगाव ग्रामपंचायत हद्दीमधील गट नंबर ९३ चे ललित गांधी हे मालक आहेत. या जमिनीमध्ये त्यांनी बेकायदेशीर प्लॉटिंग केले आहे हे प्लॉटिंग करताना जमिनीचे उत्खनन केले आहे १२ व १३ एप्रिल रोजी झालेल्या पावसामुळे या उत्खनना मधील सर्व मुरूम पाण्याने वाहून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेला आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके या मुरमा खाली गेली आहेत. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पाचगाव ग्रामपंचायतीने करवीर तहसीलदारांकडे केली आहे.