राज्य सरकारच्या निर्णयाचे काही विद्यार्थ्यांकडून स्वागत तर काही विद्यार्थ्यांकडून नाराजी
प्रतिनिधी / कोल्हापूर
बारावीच्या निकालासंदर्भातील सूत्र राज्य सरकारने ठरल्याने बारावीचा निकाल तयार करण्यास वेग येणार आहे. दहावीच्या गुणांवर 30 टक्के, अकरावीच्या गुणांवर 30 टक्के आणि बारावी अंतर्गत गुणांवर आधारीत 40 टक्के अशा पध्दतीने गुण दिले जाणार आहेत. याचा लाभ माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत 1 लाख 22 हजार 503 विद्यार्थ्यांना होणार आहे.
बारावीची परीक्षा रद्द करून दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनानुसार बारावीचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बारावीचा निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेला आज (दि. 5) पासून सुरूवात होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयातच विषयनिहाय 30-30-40 टक्के असे गुणदान करून निकालपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या अधिकृत संगणक प्रणालीत ऑनलाईन गुण भरण्यात येणार आहेत. त्यानंतर विभागीय मंडळाकडे निकालपत्रक सादर केले जाईल. राज्य शासनाच्या परवानगीने पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल जाहीर करेल. बारावीच्या निकालानंतरच पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार असल्याने काही विद्यार्थी व पालकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. तर काही गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. कारण दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी आणि बारावी दोन्ही वर्षात परीक्षा न देताच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे. तसेच भविष्यात शैक्षणिक नुकसान होईल की काय, अशी भितीही पालकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर करिअर करताना परीक्षेविना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील परीक्षेचे नियोजन करावे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करून सरासरी गुणावर उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये अभ्यासक्रम कमी करून दहावी-बारावीची वार्षिक परीक्षा ऑफलाईन घ्यावी. त्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच परीक्षेचे नियोजन केले पाहिजे, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे.