पन्हाळा तालुक्यात सातवे येथे शेतकऱ्यांशी जनसंवाद
वारणानगर / प्रतिनिधी
वाढून आलेली वीज बिले माफ केली जातील. असे एका बाजूला म्हणत सरकारने ती भरलेली नाहीत ही शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची घोर फसवणूक आहे असे प्रतिपादन म्हाडाचे माजी अध्यक्ष व भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी करून सरकारने जाहीर केल्याप्रमाणे वीज बिले माफ करावीत अन्यथा शेतकरी व सर्वसामान्य नागरीक पेटून उठून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही असा सणसणीत इशारा दिला.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी सातवे ता. पन्हाळा येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रमांतर्गत शेतकरी व नागरिकांशी आनंदराव निकम यांच्या शेतावर संवाद साधताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले, लॉकडाऊन काळात नागरिकांचे रोजगार बुडाले. व्यवसायात मंदी होती. पण वीज बिले मात्र कितीतरी पटीने वाढून आली. याबाबत आम्ही निवेदन दिले. शासनाने बजेटमध्ये शेतकऱ्याला व सर्वसामान्य नागरिकांना वीज बिलामध्ये सवलत देऊन दिलासा देऊ.दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ.असा शब्द दिला होता.पण आता वीजबिले भरलीच पाहिजेत असे म्हणत आपणच दिलेला शब्द मोडला आहे. . ही शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची घोर फसवणूक आहे. जागतिक महामारी कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना वीज बिले माफ करून शासनाने दिलासा द्यावा. अन्यथा ते पेटून उठून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष सचिन शिपुगडे रविंद्र जाधव,संजय जाधव, अविनाश चरणकर ,मंदार परितकर आदी उपस्थित होते.
मंत्र्यानेच वीज बिल भरलेले नाही
यावेळी भगवानराव काटे म्हणाले सर्वसामान्य जनतेने वीज बिले भरावीत. असा आदेश राज्य शासन एकीकडे काढत आहे .मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने आपले मुंबईतील बंगल्याचे वीज बिल भरलेले नाही .असा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता केला.हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या कारभाराचा एक नमुना आहे. मंत्र्या प्रमाणे सर्वसामान्य जनता आता वीजबिलभरणार नाही .त्यामुळे ती माफ करावीत .अशी आग्रही मागणी काटे यांनी केली.