प्रतिनिधी / कोल्हापूर
‘कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020’ अंतर्गत 1 एप्रिल 2018 नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून 30 मीटर अंतर, रोहित्रावरील भारक्षमता अशा तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या कृषीपंपाना 26 जानेवारीपर्यंत वीज जोडणी देण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 2 हजार 472 कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात आलेली आहे.
राज्यशासनाने जाहीर केलेल्या ‘कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020’ च्या अंमलबजावणीस महावितरणने प्रारंभ केला आहे. या धोरणानुसार कृषीपंप वीज जोडणीसाठी एक कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात लघुदाब वाहिनीपासून 30 मीटर अंतरात असलेल्या कृषीपंप वीज जोडणीचे लक्ष्य साध्य करण्यात आले आहे. आता पुढील तीन महिन्यात लघुदाब वाहिनीपासून 200 मीटर अंतरातील कृषीपंप वीजजोडण्या एरियल बंच केबलव्दारे देण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे. यात आर्थिक तरतुदीच्या उपलब्धते नुसार जेष्ठता यादीप्रमाणे वीजजोडणी दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना स्वखर्चाने परतावा स्वरूपात वीजजोडणी घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 1 एप्रिल 2018 नंतर पैसे भरून प्रलंबित अनुक्रमे 6 हजार 148 व 6 हजार 347 कृषीपंप वीज जोडण्या पैकी 30 मीटर अंतरातील अनुक्रमे 1 हजार 463 व 1 हजार 9 वीजजोडण्या दिलेल्या आहेत.
मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, धर्मराज पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील सर्व अधिकारी-कर्मचारी कृषीपंप वीज जोडणी धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत.