प्रतिनिधी / वास्को
गोव्यात कोळसा नको आणि रेल मार्गाचे दुपदरीकरणही नको अशी मागणी करीत कासावलीत भागात ग्राम कृती समिती, गोंयचो एकवोट, गोंयचो आवाज तसेच रेन्बो वॉरियर्स व इतर संघटनांतर्फे रॅली काढण्यात आली. गोव्याच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचीही मागणी या रॅलीमध्ये करण्यात आली.
बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास या रॅलीला प्रारंभ झाला. भाटी, आरोसी, कुयेली, बागा व कासावलीच्या इतर गावांमधून ही रॅली काढण्यात आली. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही रॅली कासावली बाजारातील स्पोर्टस् कॉम्प्लॅक्सजवळ आल्यावर या रॅलीची सांगता झाली. यावेळी अभिजीत प्रभुदेसाई, विदेश भगत व इतरांनी रॅलीला मार्गदर्शन केले. गोव्यात कोळसा नको, रेल मार्गाचे दुपदरीकरण नको, पर्यावरणाचे रक्षण करा अशा मागण्यांचे एक निवेदन या रॅलीतर्फे कासावलीचे सरपंच जुझेमारी फुर्तादो यांना सादर करण्यात आले. गोवा वाचवण्यासाठी असेच बाहेर पडा असे आवाहन यावेळी करण्यात आले.