विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची सूचना : मडगावकारांनी स्वतःहून लॉकडाऊन पुकारावे
प्रतिनिधी / मडगाव
कोविड संकटाने आक्राळ-विक्राळ रुप धारण केले आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असतानाच बळींचा आकडा मोठा होत चालला आहे. भाजप सरकारकडे जनतेला दिलासा देण्यासारखी कसलीच उपाय योजना नाही. आता ‘लॉकडाऊन’ हाच एकमेव पर्याय समोर आहे. सरकारने कडक अमंलबजावणी करुन लागू करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
सरकारने कोविड व्यवस्थापनाची धूरा समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञ व लष्कराचे कृतीदल स्थापन करुन त्यांच्याकडे सोपवावी या मागणीचा आपण पुनरुउच्चार करतो. झाले ते बस्स झाले, लोकांच्या जीवाशी अधिक खेळ नको. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने मागील एक वर्षात वैद्यकीय सुविधा व सेवा वाढविण्यावर भर न देता केवळ उत्सव साजरे केले. आता या सरकारवर विसंबून राहणे धोक्मयाचे आहे. सरकारने त्वरित कृतीदलाची स्थापना करावी व सर्व सुत्रे त्यांच्या हवाली करावीत अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली.
मान्सूनच्या दृष्टीने तयारीची गरज
कोविडच्या संकटकाळात पुढील एका महिन्यात मान्सुनचे आगमन होणार आहे. खंडित होणारी वीज, पुराचे संकट, वादळी वारे, रस्ते बंद होणे अशा संकटांमुळे उद्भवणाऱया परिस्थितीवर उपाय योजना काढण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे.
जुलैपर्यंत सर्वाना लसीचा पहिला डोस द्यावा
जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सर्व गोमंतकीयांना कोविड लसीचा पहिला डोस देण्याची तयारी सरकारने केल्यास परिस्थिती नियंत्रणात येवू शकते. कृतीदलाला आर्थिक अधिकार देत, जनतेच्या हिताचे तातडीचे निर्णय घेण्याची अनुमती देणे गरजेचे आहे.
सरकारने अजुनही दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे दोन मजले कोविड रुग्णांसाठी पुर्णपणे उपयोगात आणलेले नाहीत. सरकार इस्पितळातील जागा सोडून शेजारील शाळेचे कोविड केंद्रात रुपांतर करु पाहते हे धक्कादायक आहे. आज जवळजवळ बंद असलेली काही इस्पितळे ताब्यात घेवून सरकार तेथे रुग्णांची का सोय करीत नाही या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी देणे गरजेचे आहे.
गेंयचे दायज योजना चालीस लावा
सरकारने 100 कोटीची आर्थिक पॅकेज सामान्य व्यावसायिकांसाठी जाहीर करावी तसेच पारंपारीक व्यावसायिंकासाठी ‘गोंयचे दायज’ योजना त्वरित चालीस लावावी जेणेकरुन लॉकडाऊनचा आर्थिक प्रभाव कमी होण्यास या घटकांना मदत होईल. सरकारने यापुर्वी आपण केलेल्या सुचनांकडे मागील एक वर्ष लक्ष दिले नाही. आता तरी लोकहितासाठी भाजप सरकार माझ्या सुचना मान्य करेल अशी आशा आपण बाळगतो असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
सरकारने माझ्या सुचनांचा गांभीर्याने विचार करावा. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने मागील एका वर्षात कृतीदल स्थापन करण्यावर भर दिला नाही. आता सरकारला जाग आली आहे., केंद्र सरकारने लष्कराकडे कोविड संकटाचा सामना करण्यावर चर्चा सुरू केली आहे हे स्वागतार्ह आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांनी केलेल्या घोषणांची अमंलबजावणी होते याची खातरजमा करुन घेणे गरजेचे आहे. परवा डीडीएसएसवाय योजनेखाली कोविडचे खासगी इस्पितळात उपचार होणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. परंतु, खासगी इस्पितळांकडे त्यासबंधी आदेश पोचलाच नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कष्ट व मनस्ताप सहन करावा लागत आहे असे दिगंबर कामत यांनी लक्षात आणून दिले आहे.
मडगावकरांनी स्वताहून लॉकडाऊन करावा
मडगावचा आमदार व एक जबाबदार नागरिक म्हणून आपण मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे तमाम मडगावकरांनी कोरोनाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन पुढील आठ दिवस स्वताहून लॉकडाऊन करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
मडगावातील व्यापारी, उद्योजक, लघू व्यावसायिक यांनी स्वताहून हा लॉकडाऊन पुकारणे ही काळाची गरज आहे. जर आठ दिवस मडगावकरांनी लॉक डाऊन पुकारला तर नक्कीच कोरोनाची साखळी रोखण्यास यश येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केला आहे.