व्हाईट हाऊसमध्ये 24 सप्टेंबरला संमेलन – अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, जपानच्या राष्ट्राध्यक्षांची होणार थेट भेट
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये 24 सप्टेंबर 2021 रोजी ‘क्वाड’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिंदे सुगा हे सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने मंगळवारी याबाबत घोषणा केली आहे. विविध आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर चारही देशांचे राष्ट्राध्यक्ष आमने-सामने चर्चा करणार आहेत. कोरोना संकटकाळापासून अशी थेट चर्चा पहिल्यांदाच होणार असल्याने या संमेलनाकडे जगाचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा निश्चित झाला असून ते 24 सप्टेंबरला अमेरिकेत पोहोचतील. त्याच दिवशी ‘क्वाड’ संमेलनाला उपस्थित राहिल्यानंतर 25 रोजी ते संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण देतील.
अमेरिकेसह भारत, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांनी आता चीनच्या विरोधात एकवटणे सुरू केले आहे. 24 सप्टेंबर रोजी अमेरिकेत पहिली ‘क्वाड’ शिखर परिषद होणार आहे. वॉशिंग्टन येथे होणाऱया या शिखर परिषदेचे यजमानपद अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन प्रथमच घेणार आहेत. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विविध देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी, तसेच हवामान बदल, तंत्रज्ञान, सायबर स्पेस यांसारख्या गोष्टींवर ‘क्वाड’ नेत्यांच्या चर्चेचा भर राहणार आहे. तसेच भारत-प्रशांत क्षेत्रावरही या संमेलनात चर्चा होणार असल्याने चीनसाठी हा चिंतेचा विषय ठरणार आहे.
‘क्वाड’ म्हणजे काय?
‘क्वाड’ला ‘क्वाड्रिलेटेल सिक्मयोरिटी डायलॉग’ असे संबोधले जाते. हा भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा अनधिकृत सामरिक गट आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाही देशांच्या हितांचे रक्षण करणे आणि जागतिक आव्हाने हाताळणे हे ‘क्वाड’चे मुख्य उद्दिष्ट आहे. याची स्थापना 2007 मध्ये झाली. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान केव्हिन रुड यांनी गटातून माघार घेतली. तेव्हापासून हा गट सक्रिय नव्हता. मात्र, चीनच्या वाढत्या वर्चस्वामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली हा गट पुन्हा सक्रिय झाला.
भारताने चीनला फटकारले
‘क्वाड’च्या रणनितीवर यापूर्वी चीनने बऱयाचवेळा टीका केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी (11 सप्टेंबर) चीनचे आरोप फेटाळले आहेत. चीनने पेलेले आरोप फेटाळत वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर करणे अयोग्य असल्याचे जयशंकर यांनी म्हटले होते. भारताबरोबरच ऑस्ट्रेलियानेही चीनला फटकारले होते. चीनने ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत आणि जपानच्या ‘क्वाड’ संघटनेला आशियाई देशांची ‘नाटो संघटना’ असे संबोधत टीका केली होती.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला उत्तर देताना, वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर केले जाऊ नये, क्वाड संघटना मुख्य देशांसह जगाच्या कल्याणासाठी काम करणारे व्यासपीठ असल्याचे स्पष्ट केले होते. ‘नाटो’ हा शीतयुद्धाशी जोडलेला शब्द असल्यामुळे अशी भडकाऊ विधाने केली जाऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. भारताप्रमाणेच बांगलादेशने चीनच्या वक्तव्याबाबत नाराजी दर्शवली होती. चिनी राजदूतांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आणि आक्रमक असल्याचे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन यांनी म्हटले होते.