वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील क्षेत्रीय ग्रामीण बँकांना वित्त वर्ष 2020मध्ये जवळपास 2206 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वित्त वर्ष 2019 मध्ये निव्वळ तोटय़ाचा आकडा हा 652 कोटी रुपयांच्या घरात राहिला होता. नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर ऍण्ड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) यांच्याकडून सादर केलेल्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे.
मार्च 2020 पर्यंत देशातील 685 जिल्हय़ात 45 आरआरबी कार्यरत आहेत तर आरआरबी 26 राज्य आणि तीन केंद्र शासित प्रदेशांचाही यात समावेश राहिला आहे. वित्त वर्ष 2019-20 मध्ये 26 आरआरबींना 2203 कोटी रुपयांचा नफा झाला आहे तर दुसऱया बाजूला 19 बँकांना 4409 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची नोंद केली आहे.
स्थूल एनपीएत घसरण
मागील वित्त वर्षात आरआरबीच्या ग्रॉस नॉन परफॉर्मिंग(एनपीए)मध्ये काही प्रमाणात घसरण राहिली आहे. यामध्ये कर्ज आउटस्टँडिंगचा वाटा 10.4 टक्के राहिला आहे. वित्त वर्ष 2019 रोजी हा आकडा 10.8 टक्के होता.