नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडीतमध्ये खळबळ माजली आहे. लोकसभेतही भाजप आणि शिवसेनेमध्ये यावरुन खडाजंगी जुंपली. परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यातच अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांसंदर्भात निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या दरमहा १०० कोटींची हप्तेवसुली प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतलं. जेंव्हा भाजपाचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितलं होतं. तसेच सचिन वाझेंमुळे परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळेच हे अशा पद्दतीने खंडणी वसुल करण्याचं काम सुरु झालं आहे. हे असेच सुरु झाल्यास संपुर्ण देशात असं होऊ शकतं असेही त्या म्हणाल्या. तसेच एकट्या मुंबईतुन १०० कोटीची खंडणी मिळत असेल तर सबंध महाराष्ट्रातुन किती होत असेल, अशी विचारणा देखील नवनीत राणा यांनी या वेळी लोकसभेत केली.