प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात वारंवार वीज खंडित होत असते. वारंवार वीज खंडित होत असल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱया नोकरदार वर्गाच्या कामावर परिणाम होत आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कंपनीची नोकरी जाण्याची भीती या कर्मचाऱयांकडून व्यक्त होत आहे. सालईवाडा येथील आदिती अरुण म्हाडगूत हिने यासंदर्भात आपली व्यथा व्यक्त केली आहे.
एका कंपनीत ती नोकरी करते. ती पुणे येथे एका आयटी कंपनीत काम करते. ‘कोरोना’मुळे ‘वर्क फ्राम होम’ असल्यामुळे ती घरीच पाच महिने काम करते. कंपनीने घरी काम करण्यासाठी तिला संगणकही दिला आहे. तिच्या कामाची वेळ दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत आहे. कधीकधी रात्री एकही वाजतो. मात्र, वीज वितरणच्या कारभाराचा तिच्या कामावर परिणाम होत आहे. सालईवाडय़ात बऱयाचवेळा वीज नसते. एकदा गेली की एक-दोन तास गायब असते. दिवसाही असेच आणि रात्रीही अशीच परिस्थिती असते. त्यामुळे दिवसा काम होत नाही आणि रात्रीही झोप होत नाही. त्याचा परिणाम कामावर होतो. कंपनी कामाचा मोबदला देते. वीज नसल्याची कारणे कंपनीला देत बसलो तर कंपनी जॉब सोडायला सांगेल, अशी भीती तिला वाटते. आपल्यासारखे अनेकजण घरातून काम करतात. त्यांनाही असा त्रास सहन करावा लागत आहे. इन्व्हर्टरच्या किमती 20 हजारच्या पुढे आहेत. ते परवडणारे नाही. वीज वितरणकडे तक्रार केली तर समाधानकारक उत्तर मिळत नाहीत. त्यांचा फोनही लागत नाही. बऱयाचवेळा केला तर एकदा लागतो. पाच महिन्यात खंडित वीजपुरवठय़ाने खूप त्रास दिला. सध्या पावसाचे प्रमाण कमी असूनही वीज वारंवार जाते. वाढीव वीज बिलाबद्दल तक्रारी करायला गेले तर ‘वर्क फ्रॉम होममुळे जादा वीज वापरली जाते, अशी कारणे दिली जातात. बाहेर गेले तर कोरोना आणि घरात लाईटचा मन:स्ताप आहे, असे ती सांगते.