वाहनधारकांना ये-जा करणे बनले मुश्कील : खड्डय़ांमुळे अपघातात वाढ : त्वरित रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची नागरिकांसह वाहनचालकांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या दक्षिण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्मार्टसिटी योजनेंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याव्यतिरिक्त इतर रस्त्यांचा विकास करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे महाद्वार रोड परिसरातील मुख्य रस्त्यासह सर्व क्रॉसच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे महापालिका प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
स्मार्टसिटी योजनेचा गाजावाजा करून शहरातील अन्य रस्त्यांच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दक्षिण भागातील सर्रास रस्त्यांची वाताहात झाली आहे. मात्र स्मार्टसिटीचे काम सुरू असल्याचे सांगून महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या विकासाकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विविध रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून, 3 वर्षांपूर्वी नव्याने करण्यात आलेला महाद्वार रोड मुख्य रस्ता खड्डय़ांमध्ये हरवला आहे. रस्त्याच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेल्या काही महिन्यातच डेनेज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यामुळे सदर रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. खोदाई करण्यात आलेल्या रस्त्याची डागडूजी करण्यात आली होती, पण ती केवळ नाममात्रच ठरली आहे. डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या ठिकाणाची डागडूजी करूनही काही महिन्यातच खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे कपिलेश्वर मंदिरपासून छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलापर्यंतचा महाद्वार रोड मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करणे मुश्किल बनले आहे. खड्डय़ांमुळे या ठिकाणी अपघात घडत आहेत. दुचाकी वाहनधारकांना हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. धारवाडरोडला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे अवजड वाहनांसह दुचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. पण या रस्त्याच्या डागडुजीकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे.